मुंबई – भारतीय संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माने जबाबदारी हाती घेतल्यावर संघ अजिंक्य बनला आहे. रोहितने नेतृत्वाची जबाबदारी घेतल्यापासून भारतीय संघाने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर जितक्या सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले त्यात एकही सामना गमावलेला नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय नोंदवला आणि मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. धर्मशाला येथील विजयासह, रोहित मायदेशात खेळवण्यात आलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार बनला आहे.
रोहितने 17 व्या सामन्यात विक्रमी 16 वा विजय नोंदवून इंग्लंडच्या इयान मॉर्गन आणि न्यूझीलंडच्या केन विल्यमसन यांना मागे टाकले आहे. तसेच रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग तिसरी मालिका जिंकली आहे. यापूर्वी, नोव्हेंबरमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा 3-0 आणि त्यानंतर वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला होता.
भारतीय संघाचा हा टी-20 सामन्यांमधला सलग 11 वा विजय आहे. तसेच 2019 सालापासून घरच्या मैदानावरचा भारताचा हा सलग सातवा टी-20 मालिका विजय आहे.