मुंबई – एकीकडे मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पक्षबांधणीसाठी दौरे करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर उध्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेही राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे घराण्यातील ही तिसरी पीढी एकाच वेळी मैदानात उतरली आहे. आतापर्यंत त्यांनी परस्परांवर आरोप केले नव्हते. मात्र सध्याच्या वास्तवावर बोट ठेवत अमित ठाकरे यांनी आदित्य यांच्या दौऱ्याबद्दल सूचक टिप्पणी केली आहे.
राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर त्यांचा दौरा निघाला असता का?, असा सवाल उपस्थित करत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. आज अमित ठाकरे हे त्यांच्या महासंवाद दौऱ्यांतर्गत ठाणे शहरात आले होते. त्यावेळेस पत्रकारांसोबत अनौपचारीक चर्चा करत असताना ते बोलत होते.
माझा दौरा हा नियोजित दौरा आहे. त्यांचा दौरा आता सुरू झालेला आहे. राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर त्यांचा दौरा निघाला असता का असा प्रश्न पडतो. अशी प्रतिक्रिया देत अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
तसेच, शहरातील खड्ड्यांविषयी देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मुंबई, ठाणे शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांतील प्रवास टाळण्यासाठी मी रेल्वेने प्रवास करतो, असेही ते यावेळी म्हणाले. तर, नाशिकमध्ये मनसेने विकास केला होता. तेव्हा तेथील रस्त्यांवर खड्डे पडले नव्हते. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नागरिकांनी एकदा संधी द्यावी, असेही यावेळी अमित ठाकरे म्हणाले.