नवी दिल्ली – भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सीमा मुद्द्यावर बऱ्याच काळापासून चर्चा सुरूच असून चीन मात्र एकीकडे चर्चा सुरू असताना भारताला चिथावणी देण्याचे उद्योग कायम ठेवत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. लडाख भागात तैनात असलेल्या भारतीय जवानांना उद्युक्त करण्यासाठी चीनच्या लढाउ विमानांनी पुन्हा एकदा या भागात घिरट्या घातल्या असल्याची बातमी समोर आली आहे.
चीनची फायटर विमाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घिरट्या घालत आहेत. बरे हा प्रकार एक किंवा दोनदा घडलेला नाही तर गेल्या तीन चार आठवड्यांपासून नियमितपणे हे सगळे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, चीन कशाची तरी चाचपणी करत असल्याचा कयास यातून वर्तवण्यात आला आहे. तसेच त्या देशाकडून काही आगळिक करण्यात आली तर त्या दृष्टीनेही भारतीय हवाई दल सज्ज असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच हा प्रकार फार चिघळणार नाही याचीही खबरदारी घेतली जाते आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सरकारी सूत्रांनी सांगितले की, जे- 11 सहित अन्य चीनी लढाऊ विमाने सीमेजवळ घिरट्या घालत आहेत. दोन्ही देशांत परस्परांत विश्वास निर्माण करण्यासाठी जे काही सामंजस्य झाले होते त्याचेही उल्लंघन चीनकडून केले जात असल्याचे गेल्या काही दिवसांत आढळून आले आहे. मात्र भारतानेही मिग आणि मिराज ही आपली लढाऊ विमाने या क्षेत्रात तैनात केली आहेत. काही मिनिटांतच चीनच्या हालचालीवर आपण लक्ष ठेवू शकतो अशी काळजी घेतली जाते आहे.