नवी दिल्ली – केंद्र सरकारने सरकार आणि सामान्य नागरीकांमध्ये थेट संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सुरू केलेल्या माय गव्ह. प्लॅटफॉर्मला आज सहा वर्ष पुर्ण झाली. हा उप्रकम सरकारच्याही चांगल्या उपयोगी पडत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमीत्ताने दिलेल्या संदेशात म्हटले आहे.
अशा प्रकारचा देशातला हा पहिलाच उपक्रम होता. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 जुलै 2014 ला सुरू केला होता. सरकारला महत्वाच्या सुचना करण्यासाठी तसेच नवीन संकल्पना सुचवण्यासाठी नागरीकांनी या प्लॅटफॉर्मचा चांगला उपयोग करून घेतला. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक बदलांसाठीच्या संकल्पना येथे मांडण्याची संधी नागरीकांना देण्यात आली. यात सहभागी होऊन चांगल्या संकल्पनांचे योगदान देणाऱ्यांचे मोदींनी यावेळी आभार मानले.
गव्हर्नन्स मधील सुधारणा, गंगा स्वच्छता, मुलींचे शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्यदायी देश अशा क्षेत्रासाठी अनेकांनी यात चांगल्या कल्पना मांडल्या व उपयुक्त सुचना केल्या असे सरकारतर्फे सांगण्यात आले. त्यातील सुचनांचा देशाचे धोरण ठरवताना चांगला उपयोग झाला असेही यानिमीत्ताने नमूद करण्यात आले आहे. या पोर्टलसाठी आत्तापर्यंत 1 कोटी 22 लाख 79 हजार 631 लोकांनी नोंदणी केली आहे.