लखनौ – महाराष्ट्राने गोवा संघाचा 73 धावांनी पराभव केला. या विजयामुळे यंदाच्या सय्यद मुश्ताक आली टी-20 क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.
महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानेच नहारसह डावाची सुरूवात केली. ऋतुराज 44 धावांवर बाद झाला. या जोडीने संघाला शतकी सलामी दिली. ऋतूराजने आपल्या खेळीत 34 चेंडूत 6 चौकार फटकावले. दरम्यान नहारने आपले अर्धशतक पूर्ण केले. नहारने आपल्या नाबाद 103 धावांच्या खेळीत 68 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी केली.
विजयासाठी 178 धावांचा पाठलाग करताना गोवा संघाचा डाव 19 व्या षटकांत 104 धावांवर संपला. त्यांच्या शुभम रांजणे 35 व स्नेहल कौठणकरने 22 वगळता अन्य एकाही फलंदाजाला महाराष्ट्राच्या गोलंदाजीचा सामना करता आला नाही. महाराष्ट्राकडून सत्यजीत बच्छावने 3 तर, अझीम काझी व मुकेश चौधरी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केला. अक्षय पालकर व दिव्यांग हिमगणेकर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक :-
महाराष्ट्र – 20 षटकांत 3 बाद 177 धावा. (ऋतुराज गायकवाड 44, यश नहार नाबाद 103, दीव्यांग हिमगणेकर नाबाद 8, श्रीकांत वाघ 1-25, अमुल्य पांदरेकर 1-29). गोवा – 18.1 षटकांत सर्वबाद 104 धावा. (शुभम रांजणे 35, स्नेहल कौठणकर 22, सत्यजीत बच्छाव 3-27, मुकेश चौधरी 2-16, अझीम काझी 2-28, दिव्यांग हिमगणेकर 1-10, अक्षय पालकर 1-11).