पिंपरी – दारू पिताना झालेल्या भांडणातून इंद्रायणी नदीच्या घाटाजवळ एकाचा गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.9) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. माधव अतरूषी साबळे (वय 30, मूळगाव, मु. पो. जांब अंध, ता. सेनगाव, जि. हिंगोली), सुधाकर ऊर्फ बंटी बबन वाघमारे (वय 30, मूळगाव हिंगलजवाडी, जि. उस्मानाबाद) आणि ज्ञानेश्वर पुंडलिक शिंदे (वय 56, मूळगाव मु. पो. हाडूलकी, ता. अहमदपूर, जि. लातूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस हवालदार गणेश दशरथ कळंके (वय 48) यांनी सोमवारी (दि.9) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री साडेनऊ ते सोमवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान इंद्रायणी घाटाजवळ आळंदी येथे एक जण बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. त्यास पोलिसांनी उपचाराकरिता वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
शवविच्छेदन अहवालमध्ये त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चौकशी केली असता मयताचे नाव दिपक असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात तीन आरोपींनी मिळून मयत दीपक त्याचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले.