रायपूर – पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी समूहाने केलेल्या मारहाणीमुळे त्या व्यक्तीचा मृत्यु झाल्याने, छत्तिसगडमध्ये एकाच गावातील 25 जणांच्या गटाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी सदोष मनुष्यवधासह (कल्पेबल होमिसाईड) सामुदायिक हत्त्येचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
12 जून 2020 रोजी तेराराम तिवारी याला त्याचा मोठा भाऊ आरोपी रामगोपालच्या साथीदारांकडून गावातील माता चैराजवळ मारहाण करण्यात आली. ही माहिती मिळताच अर्जदार हॉलिलाल यांनी गावातील माता चौरा येथे जाऊन पाहिले असता पिडीत तेरारामचा मोठा भाऊ तेरसराम याला रामगोपाल साहू, गणेशराम साहू, प्रल्हाद राव, गणेशवर राव, जागेश्वरराव, सुकृतराव, प्रदीप, मुकुंद, असंत, अनुराधा, राहुल, मनीष, शिवनारायण, पालेश्वर साहू, कृष्णकुमार, प्यारेलाल, मुकेश, परमानंद, शनी, शैलेश सिंग, सुरेश, जागेश्वर केनवट, गीताबाई, प्रमिला, योगेश हे सर्वजण त्याच्यावर लाठ्या-काठ्या, विटा, दगडांनी अमानुष वार करत होते. या मारहाणीत तेरारामचा मृत्यु झाला.
नंतर अर्जदार हॉलिलाल यांनी सिटी कोतवाली जंजगीर येथे हत्येची तक्रार नोंदवली. तेराराम यांना जंजगीरच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मग पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सरकारी वकील विशाल तिवारी यांनी सांगितले की, समूहाद्वारे मारहाणीत मरण पावलेल्या तेरारामच्या या प्रकरणात, एकाच वेळेस 25 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाणे, ही भारतीय न्यायव्यवस्थेतील एक दुर्मिळ घटना आहे.