पुणे -महापालिका आपल्या यंत्रणेत 25 तृतीयपंथीयांची सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक करणार आहे. त्याअंतर्गत पहिल्या दहा जणांना सोमवारी आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार होते. मात्र, आयुक्त मुंबईत गेल्याने पालिकेने या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रच दिले नाही. आयुक्त येथे नसल्याने या व्यक्तींना परत पाठवण्यात आले.
काही तृतीयपंथी कर्मचाऱ्यांना दि. 1 जुलैपासूनच पालिकेच्या सेवेत घेण्यात आले आहे. मात्र, सुरक्षा विभागाला या कामासाठी कौतुक हवे असल्याने त्यांना नियुक्तीपत्र आयुक्तांच्या हस्ते देण्याचा अट्टाहास केला जात आहे. प्रत्यक्षात 1 जुलै रोजीच हे नियुक्तीपत्र देणे आवश्यक असताना त्यावेळी आयुक्त परदेशांत असल्याने हे पत्र देण्यात आलेले नव्हते. महापालिकेने सेवेत घेतलेल्या दहा तृतीयपंथी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी सोमवारी सकाळी गणवेशासह बोलवण्यात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी नियोजनही करण्यात आले होते. मात्र, आयुक्त सकाळीच एका बैठकीसाठी मुंबईत गेले. ही बैठक दुपारी होणार असल्याने ते सायंकाळी येतील का नाही हे निश्चित नव्हते. त्यामुळे सुरक्षा विभागाने हा कार्यक्रम रद्द करत सर्व कर्मचाऱ्यांना परत पाठविले.
पुढील काही दिवसांत आयुक्तांची वेळ मिळेल तेव्हा हा कार्यक्रम केला जाणार आहे, असे सांगितले. मात्र, अनेकदा आयुक्तांनी कधीही आपण नसू, तेव्हा कार्यक्रम रद्द करा असे सांगितले नसतानाही सुरक्षा विभागाने मात्र चमकोगिरीसाठी आयुक्तांच्या हस्तेच नियुक्तीपत्र देण्याचा हट्ट धरला आहे.
तृतीयपंथी कर्मचाऱ्यांना मनपा आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र देणार आहोत. आज हा कार्यक्रम होणार होता. मात्र, आयुक्त बाहेरगावी असल्याने तो पुढे ढकलला, असे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले.