नगर -कडाक्याच्या उन्हाने होरपळून निघालेल्या नगरकरांना गुरूवारी पडलेल्या पावसाने चांगलाच दिलासा दिला. या पावसाने शहरात मात्र दाणादाण उडाली. या पावसामुळे महापालिकेच्या गलथान कारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पाडले. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम न झाल्याने तुंबलेल्या गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत होते. त्या रस्त्यांची कामे न झाल्याने रस्त्यावर असलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यावर पावसाचे पाणी साठले होते, काही भागातील रस्ते उखडले, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला.
त्यात वीज गायब झाल्याने रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. नालेसफाईच्या कामास उशीरा सुरूवात केल्याने त्याचाही परिणाम कालच्या पावसाने दिसून आला. ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. या अचानक पडलेल्या पावसाने प्रशासनाचा कारभार किती तकलादू आहे, हे सिद्ध करून दाखवले.
शहरात गुरूवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान जोरदार पाऊस पडला. त्याआधी दिवसभर ढगाळ हवामान होते त्यामुळे पाऊस होईल असे वाटत होते. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने काहीच वेळात रस्त्यात पाणी साचले. महावितरणने वीज पुरवठा खंडित केला होता. बऱ्याच वेळ वीज गायब होती. त्यामुळे नागरिक चांगलेच घामाघूम झाले होते. अचानक सुरू झालेल्या या पावसाने प्रशासनाच्या कारभाराचेही पितळ उघडे पडले. पावसाळ्याच्या आधी नालेसफाई पूर्ण होणे अपेक्षित असताना मुळात या कामास खूप उशीर झाला. अशातच काल पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. रस्त्यांतील खड्ड्यात पाणी जमा झाले.
त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. शहरातील अनेक रस्ते खराब आहेत. भुयारी गटार योजनेसाठीही काही रस्ते खोदले आहेत. खोदलेल्या रस्त्यांची व्यवस्थित दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे पावसात या रस्त्यांवरील माती व खडी वाहून गेल्याचे दिसले. दरम्यान, नगर शहरासह श्रीगोंदा, पारनेर तालुक्यांतील अनेक गावात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे आंब्यासह फळबागांचे नुकसान झाले.