कार्ला – बुद्धलेण्या व एकवीरा देवीच्या मंदीरामुळे प्रसिद्ध असलेल्या कार्ला गडावर भाविकांना पिण्याचे पाणी देखील मुश्किल झाले आहे. तसेच स्वच्छतागृहांना टाळे लागले असल्याने विशेषत: महिला पर्यटक व भाविकांची मोठी कुचंबना होत आहे.
प्राचीन बुद्धलेण्या व एकवीरा देवस्थानमुळे दररोज हजारो भाविक व पर्यटक याठिकाण येत असतात. जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या आई एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी राज्याबरोबरच परराज्यातुन लाखो भाविक गडावर येत असतात. तर नुकताच भारतीय बौद्ध महासभेने याठिकाणी महाबुद्धवंदनेचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सुमारे पाच हजार बौद्ध बांधव उपस्थित होते.
याठिकाण आल्यानंतर पर्यटक व भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भाविकांना गडावर साधे पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध नाही तसेच पाणी टंचाईचे कारण देत स्वच्छतागृहांना टाळे लावण्यात आले आहे.
शेकडो पायऱ्या सोडून देवीच्या दर्शनासाठी गडावर आलेल्या भाविकांना पाणी व स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे त्यांची मोठी कुचंबना होत आहे. यामधून अनेक वेळा भाविक व देवस्थानचे व्यवस्थापक कर्मचारी यांच्या वाददेखील होत आहेत. चैत्र यात्रेच्या काळामध्ये हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मावळचे तहसीलदार व लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक यांच्या पुढाकारातून दोन्ही प्रश्न सोडविण्यात आले होते. यात्रा संपल्यानंतर मात्र पुन्हा तीच समस्या निर्माण झाली आहे.
कचरा देखील याठिकाणची मोठी समस्या आहे. वेहेरगाव ग्रामस्थ व अनेक सामाजिक संघटना यांनी वारंवार याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत परिसरातील कचरा व प्लास्टिक मोठ्या प्रमाणात संकलित केले. मात्र गडावर हार फुलांसाठी प्लास्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो तसेच भाविक देखील या परिसरामध्ये जेवण तयार केल्यानंतर पत्रावळ्या, ग्लास व अन्य कचरा तसाच सोडून जात असल्यामुळे कचरा ही एक मोठी समस्या बनली आहे.
“दान’ न करण्याची सोशल मीडियावर मोहीम
पर्यटक व भाविकांसोबतच या गडावर हार,फुले,प्रसाद विक्रीचा व्यवसाय करणारे स्थानिक नागरिक यांना देखील या समस्यांचा सामना करावा लागत आहे. दररोज दानपेट्यात रक्कम जमा होते. भाविकांनी दान केलेला पैसा भाविकांना सुविधा देण्यासाठी वापरणार नसाल तर दान का करायचे, असे प्रश्न उपस्थित करत मुंबई व रायगड जिल्ह्यातील भाविकांना सोशल मिडियावर यापुढे दानपेटीत दान न टाकण्याची मोहिम राबवली होती.