ग्रहण संपल्यानंतरच अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यालयात उपस्थिती
पुणे – बुधवारी असलेल्या सूर्यग्रहणामुळे महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती रोडावल्याची बाब समोर आली. हे ग्रहण 11 वाजता संपल्यानंतर अनेक अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर घरून आंघोळ करून आल्यानंतरच महापालिकेची पायरी चढणे पसंत केले. त्यामुळे एरवी गजबलेली महापालिका दुपारी 12 पर्यंत ओस पडल्याने अधिकारी आणि कर्मचारीही गायब असल्याने हा विषय चर्चेचा बनला होता.
शहरातून सकाळी 7 ते 11 पर्यंत सूर्यग्रहण दिसणार होते. मात्र, बुधवारी महापालिका नियमित चालू होती, तसेच हे शासकीय कार्यालय असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र, अद्यापही पालिकेचे अनेक अधिकारी तसेच कर्मचारी ग्रहणाच्या कालावधीत काही खावू नये, तसेच ग्रहण सुटल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय बाहेर पडू नये याच मानसिकतेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेकांनी सकाळी महापालिकेत पोहोचण्यास उशीर केला.
त्यानुसार, सकाळी 10 नंतर महापालिकेचे बहुतांश विभागांमध्ये 25 टक्केही कर्मचारी नव्हते तर, अनेक अधिकारी दुपारी 12 पर्यंत घरीच थांबून राहिले. तर, ज्या अधिकाऱ्यांच्या बैठका अतिरिक्त आयुक्तांनी नियोजित केल्या होत्या. त्यांना मात्र, नाईलाजास्तव महापालिकेत पाऊल ठेवावे लागल्याचे काही अधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना सांगितले. मात्र, आम्ही बैठकीसाठी आलो तरी जवळपास सर्वच विभागांत कर्मचारी सकाळच्या वेळी उपस्थित नसल्याचे दिसून आल्याचे या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अधिकारी नसल्याने नागरिक ताटकळत
अनेक विभागांत दुपारपर्यंत अधिकारी नसल्याने नागरिकांना ताटकळत राहावे लागले; तर काही नागरिकांनी अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त करत होते. त्यामुळे अनेक नागरिकांना अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दुपारी 3 पर्यंत थांबावे लागल्याचे दिसून आले.