मुंढवा (मनोज गायकवाड) -जॅकवेल प्रकल्प महापालिकेकडून सुरू करण्यात आला. यासाठी महापालिकेने सुमारे 100 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. मुळा-मुठा नदीपात्रातून पाणी (सांडपाणी) उचलून त्यावर प्रक्रिया करून ते पाणी जुन्या कालवाद्वारे शेतीला सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते; परंतु या प्रकल्पातून हे सांडपाणी युद्ध होते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, प्रदूषित पाणी सोडले जात असल्यानेच कालव्यात सर्वत्र जलपर्णी साचली असल्याने हा प्रकल्प “फेक’ (खोटा) ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे याबाबत या प्रकल्पाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही.
मुंढवा येथे मोठा गाजावाजा करून हा प्रकल्प उभारण्यात आला. पालिकेकडून या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रतिदिन 550 दशलक्ष लिटर आणि वर्षांला साडेसहा अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा केला जात असला तरी पालिका आणि जलसंपदा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे या प्रकल्पातून (सांड) पाणी शुद्धीकरण होत नसल्याचे कालव्यातील प्रवाहावरूनही लक्षात येते.
ही प्रक्रिया होणे अपेक्षित…
मुंढवा जॅकवेल प्रकल्पात पाण्यातील घनकचरा, तरंगणारे पदार्थ काढणे आणि हे पाणी शेतीयोग्य करणे अपेक्षित असताना ही प्रक्रिया केली जात नाही, त्यामुळे मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून येणारे पाणी शेतीयोग्यही नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे जॅकवेल प्रकल्पाबाबतच्या कार्यक्षमतेबाबतच आता नागरिकांसह शेतकऱ्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.
कालव्यात जलपर्णी साचली
मुंढव्यातून उचललेले पाणी साडेसतरा नळी येथे बंद पाइपलाइनद्वारे सोडण्यात येते. तेथून पुढे मांजरी बुद्रुक, हडपसर, लक्ष्मी कॉलनी, शेवाळेवाडी आणि फुरसुंगी हद्दीतून हा कालवा वाहतो. कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचा रंग अगदी हिरवा असून त्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असते. याशिवाय या परिसरातील कालव्यावर जलपर्णी मोठ्या प्रमाणात साचली आहे.
पाण्याचे स्रोतही दूषित…
पाणी दूषित असल्यानेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचेही स्रोत खराब झाले आहेत. कालव्यालगतच्या कुपनलिकांचे पाणीही दूषित येत आहे. त्यामुळे या प्रकल्पातून खरोखच नदीचे पाणी उचलून ते शुद्ध केले जाते का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वच्छ पाणी असते तर डास-मच्छर यांचाही उपद्रव वाढला नसता, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.