पुणे – राज्यात मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वेगवेगळ्या भागांवर त्याचा प्रभाव होत आहे. संततधार पावसामुळे मुंबई- पुणे लोहमार्गावरील खंडाळा घाटात विविध ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, रेल्वे मार्गावरील दरडी हटवण्यात येत आहेत. मात्र पावसाचा जोर कायम असल्यामुळे दरडी हटवण्याच्या कामात अनेक अडथळे येत आहेत. घाट परिसरात पावसासह जोरदार वारे वाहत असल्याचने दरडी कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत.
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना सध्या रस्ते मार्गे प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले असून गरज असेल, तरच घराबाहेर पडा, अशी सूचना प्रशासनाने केली आहे. रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी अगोदरच रेल्वे प्रशासनाने जाळ्या लावल्या आहेत. मात्र तरीही इतर काही ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडत असल्यामुळे पावसाचा जोर ओसरून दरडी हटवल्यानंतरच रेल्वे सेवा सुरु होणे शक्य होणार आहे.