आंबेगाव, शिरूर तालुक्यातील 85 गावांचा पाणीप्रश्न मार्गी
मंचर – आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोहे पाझर तलाव बुधवारी (दि. 21) रात्री शंभर टक्के भरला आहे. सुमारे अर्धा टीएमसी पाणीसाठा तलावात असून तलाव भरल्याने घोडनदीला पूर आला आहे.
हुतात्मा बाबु गेणु सागर (डिंभे धरण) धरणामध्ये 43.72 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण भरण्यासाठी अजूनही पावसाची आवश्यकता आहे. गोहे खुर्द, गोहे बुद्रुक इत्यादी गावांच्या जंगल क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोहे पाझर तलाव भरला. डिंभे धरणाच्या पायथ्याशी तलाव भरल्याने घोडनदी भरून वाहत आहे. यामुळे आंबेगाव, शिरूर तालुक्यातील घोडनदी काठावरील सुमारे 85 गावांचा शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
पावसाचे प्रमाण मंगळवारपर्यंत होते, त्यामुळे घोडनदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे पडण्याची शक्यता निर्माण झाली होती; परंतु बुधवारी (दि. 21) रात्री झालेल्या पावसाने गोहे तलाव भरून सांडव्यावरून पाणी घोडनदी पात्रात भरून नदी दुथडी भरून वाहत आहे.
गुरुवारी सायंकाळपर्यंत घोडनदीस आलेले पुराचे पाणी शिरूरजवळील बंधाऱ्यात पोहोचल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गोहे तलावाचा अर्धा टीएमसी पाणीसाठा भरून सांडव्यावरून जवळपास एक टीएमसी पाणी घोडनदीपात्रात वाहून गेल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.