मुंबई- मुंबईत सोमवारी सर्वत्र अचानक जो वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला त्यामागे घातपात असण्याची शक्यता राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. आज येथे वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही शंका व्यक्त केली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी एकाच वेळी वीज अचानक गायब होणे ही छोटी बाब नाही असे ते म्हणाले.
ते म्हणाले की यावर उपाययोजना म्हणून आमच्या पथकांनी 400 केव्हीच्या कळवा-पडगा लाईनवर काम सुरू केले असून सर्किट 1 वरील लोड सर्किट 2 वर बदलण्यात आला आहे.खारघरचे वीज युनिट बंद पडले असून त्यात काही तांत्रिक बिघाड झाला आहे. या वीज गायब होण्याच्या प्रकारामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असेही मंत्र्यांनी नमूद केले. आम्ही या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नियुक्ती केली असून याच्या चौकशीसाठी केंद्राचेही एक पथक मुंबईत आले आहे. केंद्राच्या समितीचा रिपोर्ट एक आठवड्यात येईल असेही राऊत यांनी सांगितले. सन 2011 सालीही असाच प्रकार घडला होता त्याचाही अभ्यास केला जात आहे असे ते म्हणाले. सुमारे दोन तासांच्या अवधीनंतर पर्यायी मार्गाने मुंबईच्या अनेक भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला.