मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई शहराबाबतच्या बेताल वक्तव्यानंतर एका वेगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं मुंबईत येऊ नये, असं म्हटलं होत. हा वाद आता विधीमंडळात जाऊन पोहचला आहे. यासंबंधी एका मुलाखतीत संजय राऊत यांनी मुंबई शिवसेनेच्या मालकीची नसून ती महाराष्ट्राची आहे, अशी भूमिका मांडली आहे.
संजय राऊत म्हणाले कि, मुंबई शिवसेनेच्या मालकीची नसून ती महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षाची मुंबई आहे. म्हणून तर विधानसभेतील प्रस्तावावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप असे सगळे एकत्र आहेत. यासंदर्भात सर्वांत आक्रमक भूमिका कुणी घेतली? अनिल देशमुखांनी काही गोष्टी ठामपणे सांगितल्या. मुंबईचा अपमान करणाऱ्याला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे राज्याचे गृहमंत्री म्हणाले. यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सचिन सावंत या तिघांनीही ठामपणे सांगितले, मुंबईविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा. कारण हा विषय राज्याचा आहे, एखाद्या पक्षाचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
तसेच एखाद्या चॅनेलवर नरेंद्र मोदी साहेबांवर, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एकेरी उल्लेखात कुणी काही बोलले असते, तर तुरुंगात गेले असते. इतर राज्यात तसे झाले आहे. उत्तर प्रदेशात बघा. योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात कुणी कार्टून काढले, कुणी लिहिले, तर तुरुंगात गेलेत. महाराष्ट्रात तशी परंपरा नाही. आम्ही संयमाने वागतो, काटेकोरपणे वागतो, कायद्याचे पालन करतो, त्याचा गैरफायदा हे लोक घेत आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये इतकीच अपेक्षा असल्याचे सामानाच्या अग्रलेखात म्हटले आहे. तर याला कंगनाने देखील उत्तर दिले आहे. ‘मी 16 वर्षांची असताना मुंबईला आले होते. त्यावेळी काही मित्रांसोबत मुम्बादेवीच्या दर्शनाला गेले आणि मला मुम्बादेवीने तिच्याजवळ ठेवून घेतले’, असे कंगनाने ट्वीट करत म्हटले आहे.