समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – एकमेकांशी असलेल्या राजकीय संबंधांना व्यक्तिगत संबंधांचा मुलामा देत त्याचा राजकारणात सोयीनुसार वापर सुरू झाला आहे. त्यामुळे पक्षनिष्ठ नेते अन् एकनिष्ठ कार्यकर्ते हे समीकरण मोडीत निघून “बहुपक्षीय नेते अन् सर्वपक्षीय कार्यकर्ते’ हे नवेच समीकरण उदयास आले आहे. राजकारण्यांचे एकमेकांशी राजकारणापलीकडचे व्यक्तिगत संबंध असतातच, त्यात गैर काहीच नाही. परंतु, व्यक्तिगत संबंध आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप, सदाशिव पाचपुते यांनी या गोष्टी जपल्या. शिवाय या नेत्यांची कार्यकर्त्यांवर “पकड’ तर होतीच आणि आदरयुक्त दराराही होता. परंतु, नेत्यांच्या एकामागे एक जाण्याने राजकारण पूर्णतः अस्थिर झाले आहे.
तालुक्यात कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्येही उथळपणाचे राजकारण बघायला मिळत आहे. त्यातूनच गेल्या काही काळात सर्वपक्षीय संबंध जोपासण्याची नवी “स्ट्रॅटेजी’ उदयास आली असून, त्या राजकीय संबंधांना सोयीनुसार व्यक्तिगत संबंधांचा मुलामा देऊन स्वहित साधले जात आहे. यामध्ये नेतेमंडळी आणि कार्यकर्ते कोणीच मागे राहिले नसल्याचे दुर्दैवी वास्तव आहे. माजी आ. राहुल जगताप राष्ट्रवादीत असले, तरी त्यांचे विखे-कर्डिलेंशी असलेले संबंध नेहमीच चर्चेत असतात. शिवाय पक्षाबाहेरील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना “ताकद’ देण्यात ते माहीर आहेत.
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे कॉंग्रेसमध्ये आहेत. मात्र, त्यांची भाजपमधून कॉंग्रेसमध्ये घरवापसी कधी झाली हे कोणालाच समजले नाही. नागवडेंचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतचे संबंधही “खास’ आहेत. भाजपच्या विखे पाटील घराण्याचा “झेंडा’ घेऊन मिरवणारे दुसऱ्या फळीतील नेतेमंडळी तालुक्यात मात्र भाजप आ. बबनराव पाचपुते यांच्याऐवजी माजी आ. राहुल जगताप यांच्या वळचणीला दिसतात. ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस राष्ट्रवादीत असले, तरीते कॉंग्रेसजनांमध्येच अधिक दिसतात. सुपूत्र गणेश भोस थेट शिंदे गटात डेरेदाखल झाले आहेत. राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा हे खा. सुजय विखेंच्या राजकीय कार्यक्रमात दिसले. नगरपालिकेतील राजकीय परिस्थिती समजण्यापलीकडे गेली आहे. कॉंग्रेस नगरसेवक मनोहर पोटे भाजप खासदारांच्या भेटीला दिसले. शिंदे गटाचे नगरसेवक कॉंग्रेस नेत्याच्या कार्यक्रमाला तर भाजप नगरसेवक राष्ट्रवादी आमदाराच्या सत्काराला हजर होते.
एकूणच, तालुक्यातील नेत्यांवर वरिष्ठ नेत्यांची “कमांड’ राहिली नाही. तीच परिस्थिती या नेत्यांची कार्यकर्त्यांबाबत झाली आहे. नेत्यांना एकनिष्ठ कार्यकर्त्यांपेक्षा समाज माध्यमांवर “जयजयकार’ करणारे कार्यकर्ते जवळचे वाटू लागले आहेत. परिणामी, “ग्राउंड’वरचे कार्यकर्तेही आता व्यक्तिगत संबंध आणि विकास “कामां’च्या नावाखाली सगळ्याच नेत्यांच्या दरबारात दिसू लागले आहेत. नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांविषयी आत्मीयता उरली नसल्यानेच “बहुपक्षीय नेते अन् सर्वपक्षीय कार्यकर्ते’ या समीकरणाला खतपाणी मिळत आहे. या “स्ट्रॅटेजी’चे राजकारणावर दुष्परिणाम होणार, हे नक्की.
तालुकाध्यक्षही नाहीत अपवाद
सर्वपक्षीय संबंध जपण्यात तालुकाध्यक्षांसह पक्षीय पदांवरील मंडळीही मागे राहिलेले नाहीत. स्वपक्षातील नेत्यांवर जाहीर टीका करतानाच दुसऱ्या पक्षातील मंडळींशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासून आहेत.