कोपरगाव, (प्रतिनिधी) – सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढल्या असून, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील केवळ गुण स्पर्धेत टिकण्यासाठी पुरेसे नाहीतर विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये वेगवेगळ्या पैलुंची रूजवन करून बहुआयामी व्यक्तिमत्व विकसित करावे, यासाठी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे तंत्र शिक्षण संचालनालय, नाशिक विभागाचे जॉईंट डायरेक्टर डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (एमएसबीटीई) प्रायोजित व संजीवनी के.बी.पी.पॉलीटेक्निक आयोजित राज्यस्तरीय तांत्रिक प्रश्नमंजुषा स्पर्धांच्या (क्वीज कॉम्पिटिशन) उद्घाटन प्रसंगी डॉ. गर्जे प्रमुख उद्घाटक म्हणुन बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी एमएसबीटीई,
छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयाचे असिस्टंट सेक्रेटरी प्रा. परमेश्वर सोळंकी, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकुर, पॉलिटेक्निक प्राचार्य ए.आर. मिरीकर, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख प्रा. जी.एन. वट्टमवार, पॉलिटेक्निक नियमन मंडळाचे सदस्य, उद्योेजक मिलिंद तारे, वीरेश अग्रवाल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंंग विभागाचे प्रमुख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘बेस्ट टिचर’ पुरस्कार प्राप्त झाल्याबध्दल व डॉ. पी. व्ही. ठोकळ यांनी पीएच.डी ही पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ. गर्जे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी प्रा.वट्टमवार यांनी उपस्थितांचे स्वागत करून तांत्रिक प्रश्नमंजूषा स्पर्धेबाबत माहिती दिली. प्राचार्य मिरीकर यांनी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध संस्थांची माहिती देऊन संजीवनी पॉलिटेक्निकच्या विविध उपलब्धींबाबत सांगितले.
एकदिवसीय राज्यस्तरीय तांत्रिक प्रश्नमंजूषा स्पर्धेत नागपूर व छत्रपती संभाजीनगर विभागातून एकुण ३७ टीम्सने सहभाग नोंदविला. यात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, यवतमाळने १५ हजारांचे रोख प्रथम बक्षिस जिंकले. नाशिकच्या संदीप फाऊंडेशनने १० हजारांचे रोख दुसरे बक्षिस जिंकले. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, नाशिकने ५ हजारांचे तिसरे बक्षिस जिंकले. स्पर्धेचे समन्वयक प्रा. एस. पी. तनपुरे यांचेसह मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या शिक्षकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.