पुणे -राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांवेळी प्रकृती गंभीर असतानाही आमदार मुक्ताताई टिळक यांनी मुंबई गाठून मतदानाचा हक्क बजावला. या लढवय्येगिरीचे त्यावेळचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेत्यांनी टाळ्या वाजवून कौतुक केलेच; परंतु या निवडणुकीत झालेला विजय त्यांनी मुक्ताताई टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पित केला होता.
10 जून 2022 रोजी राज्यसभेच्या जागांसाठी मतदान होते. “एकही मत वाया जाता कामा नये, पक्षाला एकेक मतांची गरज आहे, त्यामुळे मला जावे लागेल,’ असा चंग बांधून मुक्ताताई यांनी मुंबई गाठली. पुण्यातून त्यांना एअरलिफ्ट करून मुंबईत नेण्यात आले. कार्डियाक ऍम्ब्युलन्सद्वारे त्यांना स्ट्रेचरवर विधिमंडळात आणण्यात आले. त्यांच्यासमवेत आमदार गिरीश महाजनही होते. त्यानंतर त्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. दरम्यान, 20 जून 2022 रोजी त्या पुन्हा पक्षासाठी धावून गेल्या. विधानपरिषद निवडणुकीवेळीही मुक्ताताई यांनी विधिमंडळात मतदान केले. फडणवीस आणि जिंकलेल्या सर्व आमदारांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली.
“विधानपरिषदेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशावेळी भाजप मागे कसा राहील? पक्षाने दिलेले आदेश पाळणे हे आमच्या रक्तातच आहे. त्यामुळे मी पक्षाच्या मतदानासाठी जात आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यावेळी मुक्ताताईंनी दिली होती. त्यावेळीही ऍम्ब्युलन्सने त्या विधिमंडळाच्या आवारात दाखल झाल्या. तेथून व्हीलचेअरवर त्यांना मतदानाच्या ठिकाणी नेण्यात आले. तेथून वॉकरच्या सहाय्याने मतपेटीपर्यंत जाऊन त्यांनी मतदान केले. त्यावेळी त्यांना धाप लागत होती, परंतु पक्षासाठी सर्वकाही, या भावनेतून त्यांनी हे केले.