नगर – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदूरबार जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी नुकताच संवाद केला. व्हिडीओ कॉन्फरन्स कॉलद्वारे त्या-त्या जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रश्नांची खासदार सुळे यांना माहिती दिली.
महिला आघाडीच्या राज्य समन्वयक माजी आमदार उषा दराडे, सुरेर्खा ठाकरे, तीलोत्तमा पाटील यांनीही या संवादात भाग घेतला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस निर्मला मालपाणी यांनी नगर जिल्ह्यातील सध्याची स्थिती व भविष्यात लॉकडाऊन उघडल्यानंतरच्या कामांचा प्राधान्यक्रम कसा असावा, याविषयी भूमिका मांडली. दरम्यान, दरवर्षी जानेवारी ते मे महिन्यात भरणाऱ्या जत्रांमध्ये अनेक छोटे व्यवसायिक सहभागी होतात. या वर्षी त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना शासनाकडून मदत मिळवून द्यावी लागेल. लोककलावंत व तमाशा कलावंत यांचेही त्यात नुकसान झालेले आहे. त्यांचाही प्राधान्यक्रमाने विचार करावा लागेल.
करोनाच्या पार्श्वभूमीवर बचत गटाच्या महिलांनाच यशस्विनीच्या माध्यमातून मास्क व सॅनिटायझरची कामे मिळावीत. कारण अन्य व्यवसाय बंद असून, सध्या या बचत गटांकडे दुसरी कामे कमी झाली आहेत. शिवाय महिला बचत गट चांगल्या प्रतिची मास्क तयार करु शकतात, अशी भूमिका मालपाणी यांनी मांडली.
मोबाईल ही अत्यावश्यक सेवा आहे. परंतु घरी बसून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना व इतरांना शॉप बंद असल्यामुळे इंटरनेटची व कॉलिंग चे सेवेची अडचण येत आहे त्यामुळे मोबाईल सेवेचे शॉप चालू करण्यात यावेत. रेशनकार्डवर जे धान्य वाटप केले जाते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महिलांचीच नेमणूक करण्यात यावी.
दाखल्यांवर मिळावे स्वस्त धान्य..!
ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत त्यांना ग्रामपंचायत नगरपालिका किंवा महापालिकेलच्या दाखल्यांवर रेशन देण्यात यावे. केसरी कार्डधारकांना ही या काळात रेशन देण्याची घोषणा झाली आहे. तथापि, त्यांना त्यांची दुकाने कुठे आहेत, हे तत्काळ समजण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली.