चंडीगढ – भाजपविरोधात मजबूत राजकीय आघाडी उभी करण्यासाठी विरोधक प्रयत्नशील असल्याचे चित्र काही दिवसांपासून आहे. अशात भारतीय राष्ट्रीय लोक दलाचे (आयएनएलडी) प्रमुख आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी राष्ट्रीय पातळीवर तिसरी आघाडी स्थापण्यासाठी हालचाली करण्याचे सूतोवाच केले आहे.
चौटाला यांनी येथे पत्रकारांशी बोलताना तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेची गरज व्यक्त केली. केंद्रातील जनताविरोधी आणि शेतकरीविरोधी सरकारपासून देशाला मुक्ती मिळायला हवी. त्यासाठी विरोधकांनी एका व्यासपीठावर एकत्र यायला हवे.
तसे आवाहन करण्यासाठी मी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहे. मजबूत तिसरी आघाडी उभी राहिल्यास सरकारला पाठिंबा देणारे पक्षही आमच्या बरोबर येऊ शकतील. त्यातून मुदतपूर्व निवडणूक घेण्याची शक्यता निर्माण होईल, अशी भूमिका चौटाला यांनी मांडली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्या विरोधकांच्या ऐक्यासाठी सक्रिय झाल्याचे मानले जात आहे. अशात चौटाला यांनी वेगळ्या आघाडीचा मुद्दा पुढे केला आहे.
नितीश यांच्याशी भेट निश्चित
तिसऱ्या आघाडीचे सूतोवाच करणाऱ्या चौटाला यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी लवकरच भेट होणार असल्याचे नमूद केले. दोन राजकीय नेते भेटले की स्वाभाविकपणे राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणार, असे म्हणत त्यांनी प्रस्तावित भेटीमागचे कारण उघड केले नाही. मात्र, त्यांची भेट राजकीय तर्क-वितर्कांना खतपाणी घालणारी ठरण्याची चिन्हे आहेत.