ढिम्म प्रशासनावर नेटकऱ्यांचा हल्लाबोल
बिहार: महान गणितज्ज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचा मृत शरीर अनेक तास पीएमसीएच कॅम्पसमध्ये पडून राहिले, परंतु प्रशासनाला रुग्णवाहिकेची सुद्धा व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर रोष व्यक्त होत आहे. ज्या व्यक्तीने आइनस्टाइनच्या सिद्धांताला आव्हान दिले होते, त्यांना आज देशाच्या सिस्टमने आव्हान दिले, अश्याप्रकारे लोक रोष व्यक्त करत आहेत.
नारायण सिंह यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. सिंह यांच्यावर राजकीय सन्मानात अंत्यसंस्कार झाले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने साधी रुग्णवाहिकेची सुद्धा सोय केली नसल्यामुळे नेटकऱ्यानी संताप व्यक्त केला आहे.
सिंह यांचा जन्म भोजपूर जिल्ह्यातील बसंतपूर गावात झाला. त्याचे शिक्षण अविभाजित बिहारमधील नेतरहाट शाळेतून झाले. त्यांनी पाटणा विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि त्यानंतर ते 1965 मध्ये “पीएचडी’साठी कॅलिफोर्निया विद्यापीठात गेले. 1969 मध्ये “सायकल वेक्टर स्पेस’ या सिद्धांतावर त्यांनी आपली पीएचडी पूर्ण केली. सिंह यांनी कानपूरमधील “आयआयटी’ आणि कोलकातामधील “इंडियन स्टॅस्टिस्टिकल इन्स्टिट्युट’मध्ये दीर्घकाळ अध्यापन केले होते. ते मधेपुरा येथील बी एन मंडल विद्यापीठात अतिथी प्राध्यापक देखील होते.