पुणे – महापालिकेच्या बालगंधर्व रंगमंदिरात प्रेक्षकांना शनिवारी नाटक बघताना टाळ्या वाजविण्याऐवजी “डास’ मारण्याची वेळ ओढावली. नाट्यगृहाच्या आतील बाजूस मोठ्या प्रमाणात डास असल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
शनिवारी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात एक नाट्यप्रयोग सुरू होता. त्यामुळे साडेचार वाजेपासूनच प्रेक्षक येत होते. सुरूवातीला दिवे सुरू असल्याने डासांचा त्रास जाणवत नव्हता. मात्र, नाटक सुरू झाल्यानंतर नाट्यगृहातील इतर दिवे बंद करण्यात आले आणि डासांचा उपद्रव वाढला. पहिल्या ते शेवटच्या रांगेपर्यंत प्रेक्षकांना हा उपद्रव सहन करावा लागत होता. मध्यंतरावेळी येथील काही प्रेक्षकांनी दैनिक “प्रभात’कडे याबाबत कैफियत मांडली. शिवाय, नाट्यगृह परिसरात आणि आतही पुरेशी स्वच्छता नसल्याची तक्रार करण्यात आली.
दरम्यान, अवघ्या आठवडाभरापूर्वीच महापालिकेने या नाट्यगृहाच्या स्वच्छतेचे काम यांत्रिकीकरणाद्वारे करण्याचा निर्णय घेत निविदा प्रक्रिया राबवली होती. यासाठी तब्बल 12 निविदा आल्या होत्या. तसेच सर्वच्या सर्व एकाच दराच्या होत्या. त्यामुळे चिठ्ठी काढून हे काम देण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात यंत्रांऐवजी हातानाचे स्वच्छता केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रशासनाने या प्रकाराची दखल घेण्याची गरज आहे.
एसी नावालाच..
यावेळी नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणाही नावालाच असल्याची तक्रार प्रेक्षकांकडून करण्यात आली. त्यामुळे आधीच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना रनाटक पाहताना घामाच्या धारांचाही सामना करावा लागला. याबाबत काही नागरिकांकडून नाट्यगृहाच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.