पुणे : बारावीच्या परीक्षेत तब्बल 10 हजार 47 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यात मुंबई विभागातील सर्वाधिक 2 हजार 766 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील एकाही विद्यार्थ्याला 100 टक्के गुण मिळालेले नाहीत.
36 हजार 370 विद्यार्थ्यांना 85 ते 90 टक्के गुण मिळाले आहेत. 72 हजार 575 विद्यार्थ्यांना 80 ते 85 टक्के, 1 लाख 11 हजार 867 विद्यार्थ्यांनी 75 ते 80 टक्के गुण प्राप्त केले आहेत. 1 लाख 51 हजार 843 विद्यार्थ्यांना 70 ते 75 टक्के, 1 लाख 83 हजार 694 विद्यार्थ्यांना 65 ते 70 टक्के, 2 लाख 23 हजार 646 विद्यार्थ्यांना 60 ते 65 टक्के, 4 लाख 94 हजार 466 विद्यार्थ्यांना 45 ते 60 टक्के दरम्यान गुण मिळाले आहेत. 45 टक्के पेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 90 हजार 851 एवढी आहे.
प्राविण्यासह प्रथम श्रेणीत 75 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविण्यांमध्ये 2 लाख 30 हजार 769 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात 39 हजार 340 एवढे सर्वाधिक विद्यार्थी औरंगाबाद विभागातील आहेत. प्रथम श्रेणीत 60 टक्केच्या पुढे 5 लाख 58 हजार 678 विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत. द्वितीय श्रेणीत 45 टक्केच्या पुढे 4 लाख 93 हजार 442, उत्तीर्ण श्रेणीत 35 टक्केच्या पुढे 73 हजार 715 विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत.
विविध अर्ज करा ऑनलाइन
गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या प्रती, फेरमूल्यांकन यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार असून यासाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत.
छायाप्रत अर्जासाठी 29 जूनपर्यंत अर्ज
गुणपडताळणीसाठी 10 जून ते 20 जून या कालावधीत शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरुन अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी 10 ते 29 जूनपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायापत्र घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील पाच कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची गुणपडताळणी प्राधान्याने
जेईई व नीट परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायापत्र व पूनर्मूल्यांकन तातडीने व प्राधान्याने करण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान या विषयांच्या उत्तरपत्रिकेचे फेरमूल्यांकन करुन देण्यात येणार आहे.