आळंदी, – शिक्षणाला वयाची अट नसते या उक्तीप्रमाणे गोलेगाव येथील महिला ताई सदाशिव कानडे (रा. गोलेगाव, ता. खेड, पुणे) वयाच्या 45व्या वर्षी इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. ताई कानडे यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये बारावीची परीक्षा दिली होती. नुकताच निकाल जाहीर झाला असून त्या 66.33 टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. नविन माध्यमिक विद्यालय मरकळ, या विद्यालयात प्रवेश घेऊन त्यांनी परीक्षा दिली होती.
ताई कानडे म्हणाल्या की, मला वकील व्हायचे होते. पण गरीबी आणि पाच भावंडे यामुळे लवकर लग्न करण्यात आले. तर वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी विधवेचे जिणे वाट्याला आले आणि एका मुलासह सर्व जबाबदारी एकटीच्या खांद्यावर आली. सासरी कवडीमोलाची किंमत झाली म्हणून माहेरी वडीलांच्या आश्रयाला आले पण तिथेही नशीबाने थट्टाच केली. काही कालावधीतच वडीलांचेही छत्र हरपले आणि लहान भावंडांचीही जबाबदारी माझ्यावर पडली.
या सगळ्या कचाट्यात माझी शिक्षणाची इच्छा दबत गेली. कमी असलेल्या शिक्षणामूळे घर चालवणे, मुलाचे शिक्षण, आई व भावंडांना सांभाळणे यासाठी मिळेल ती नोकरी केली. अथक कष्ट वाट्याला आले. पण कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व, अस्मिता टिकवून ठेवली. प्रतिकुल परिस्थितीपुढे कधीच गुडघे टेकले नाही. अनेक वादळे आली, अनेक संकटांशी दोन हात केले. अथक परिश्रमातून घराचा निवारा केला. मुलास इंजिनिअर केले. हे सर्व करत असताना सतत शिक्षणाची उणीव भासत होती.
शिक्षणाची उणीव स्वस्थ बसू देत नव्हती. मुलगा इंजिनिअर झाल्यावर थोडा मोकळा श्वास घेता आला आणि अखेर आज वयाच्या 47व्या वर्षी 17 नंबर चा फाॅर्म भरून 12 वी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आहे.1992 ला दहावी झाली होती. म्हणजे तब्बल 31 वर्षांनी पुन्हा शिक्षणास सुरूवात केली. आता माझ्या वकीलीचा प्रवास सुरू होणार आणि मी त्यास सज्ज आहे.
पुढे त्या म्हणतात, मी एवढंच सांगेन की मुलींनो वेळ सांगून येत नाही म्हणून शिक्षणाचा हातचा राखून ठेवा अन्यथा हाल अपेष्टा, अपार कष्ट वाट्याला येतात आणि आपल्या आयुष्यातील अनमोल सुखाचे क्षण हवे त्या वेळेस मिळत नाही.