आयझॉल – हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील 7,500 हून अधिक लोक आश्रय घेण्यासाठी मिझोराममध्ये पोहोचले आहेत. मिझोराम राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ते म्हणाले की, सोमवारी संध्याकाळपर्यंत एकूण 7,500 स्थानिक ‘जो’ लोक, ज्यांना मणिपूरमध्ये कुकी म्हणतात, मिझोरामला गेले आहेत. या लोकांनी मिझोरामच्या आठ जिल्ह्यांमध्ये आश्रय घेतला आहे.
कोलासिबमध्ये सर्वाधिक विस्थापित लोक पोहोचले आहेत, ज्यांची संख्या 2,685 आहे, त्यानंतर आयझॉलमध्ये 2,386 आणि सैतुअलमध्ये 2,153 लोक आहेत. विस्थापितांना तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे, तर काहींना त्यांच्या नातेवाईकांनी आश्रय दिला आहे.
मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथंगा म्हणाले की, भारतातील सर्व जमातींचे एकत्रीकरण करणे आणि त्यांना एका प्रशासकीय घटकाखाली आणणे हे मिझो नॅशनल फ्रंटच्या संस्थापकांचे मुख्य उद्दिष्ट आहे. यापूर्वी मणिपूरमधील कुकी समाजाच्या 10 आमदारांनीही त्यांच्या राज्यातील पर्वतीय प्रदेशासाठी स्वतंत्र प्रशासनाची मागणी केली आहे.
मणिपूरमधील बहुसंख्य मेईतेई समुदायाने अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी 3 मे रोजी काढलेल्या ‘आदिवासी एकता मार्च’ दरम्यान हिंसाचार झाला होता. त्यावर नियंत्रण आणल्यानंतर अजूनही हिंसाचाराचे प्रकार घडतच आहेत.