पुणे – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये होणारी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दोन महिने लांबणीवर टाकली आहे.
चालू शैक्षणिक वर्षात ही परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे निश्चित केले आहे. याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने निर्णयही जारी केला आहे.
करोना पार्श्वभूमिवर मार्चपासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षणाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा शिष्यवृत्तीची परीक्षा वेळेत घेणे शक्य होणार नसल्याची परिस्थिती आहे.
दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी परीक्षा घेण्यात येते. त्याबाबतची अधिसूचना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच जाहीर होते. पावणेदहा लाखांपर्यंत विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदणी करतात.