मुंबई – मनी लॉड्रिंग प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा मिळाला असून एमएमआरडीएने आपला अहवाल मुंबई आर्थिक गुन्हे शाखेला दिला आहे. आता या अहवालाची कागदपत्रं ही सरनाईक कुटुंब अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडे देण्याची शक्यता आहे.
प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांवर ईडीने छापे टाकले होते. यात टॉप सिक्यरिटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा दावा ईडीने केला होता. या प्रकरणी एमएमआरडीएमधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा ईडीने न्यायालयात केला होता.
परंतु, टॉप्स सिक्युरिटीच्या 175 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे एमएमआरडीएचा अहवाल सादर करण्यात आला होता. यात एमएमआरडीएने दाखल केलेल्या अहवालात कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा उल्लेख केलेला नाही.
टॉप्स कंपनीने एमएमआरडीएला 500 सुरक्षारक्षक कंत्राटानुसार दिले होते. त्यापैकी 70 टक्के सुरक्षा रक्षक कामावर येत होते. मात्र, तरीही सर्वच 500 सुरक्षारक्षकांचं वेतन काढले जात असल्याचा आरोप रमेश अय्यर यांनी केला होता.
या आरोपांवर स्पष्टीकरण देताना एमएमआरडीएने खुलासा करताना या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे अहवालात म्हटले आहे. आता हा अहवाल सरनाईक कुटुंबीय ईडीकडे सादर करणार आहे.