वेल्हे -करोना काळात दोन वर्षांपासून रखडलेल्या विवाह सोहळ्यांना 2022 मध्ये सुगीचे दिवस आले आहेत. लग्नघरी मौजमजा करण्याची लगबग सुरू असताना मानपाननाट्यही रंगत आहे. ग्रामीण भागातही विवाह कार्यक्रम कार्यालयामध्ये करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. तर अनेक ठिकाणी राजकीय मंडळींच्या उपस्थितीमुळे शुभ मुहूर्त टळत आहेत. त्यामुळे नातेवाईक, सगेसोयऱ्यांची गोची झाली आहे.
मागील दोन वर्षांमध्ये लॉकडाऊनमुळे रखडलेले विवाह सोहळे यंदा 2022 मध्ये पार पाडण्यासाठी वधू- वर पक्षाने तयारी केली आहे. बाजारपेठेलाही सुगीचे दिवस आले आहेत. तर अनेक ठिकाणी कार्यालयीन संस्कृती वाढत वाढताना पाहायला मिळत आहे. मानपान नाट्यानेही हे विवाह समारंभ गाजत आहेत.
भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी हे विवाहस्थळी हजेरी लावताना दिसत असताना त्यांच्या येण्याची वाट पाहताना व त्यांच्या वेळेनुसार विधी करण्याकडे काही कुटुंबाचा कल आहे. विवाह मुहूर्ताची वेळ टळत असून या सर्व प्रकाराला वऱ्हाडी मंडळीसुद्धा कंटाळली आहेत. काही लोक तर विवाह सोहळ्यासाठी न थांबता यजमानांची भेट घेऊन मार्गस्थ होत आहेत. यास वेल्हे तालुकाही अपवाद नाही.
मुला- मुलींचे विवाह जुळविताना त्यांचा जीवनात सुख समाधान लाभावे म्हणून पत्रिका काढण्यापासून ते विवाहाच्या मुहूर्तापर्यंतची सर्व तारेवरची कसरत वधू- वर पक्षाकडून केली जाते. मात्र, प्रत्यक्ष लग्नगाठ बांधताना या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे सर्वत्र चित्र आहे. याला सर्वस्वी इर्षा व खोटी प्रतिष्ठा याच गोष्टी कारणीभूत असल्याचे सांगायला कोणा जोतिषाची गरज नाही.
ग्रामीण भागातही कार्यालयीन संस्कृती रुजत आहे. त्यामुळे आपले पानाची भावनाच लोप पावली जात आहे. नात्यागोत्यातील लोकांनी एकोप्याने एकत्र येत असे. धार्मिक विधी पार पडायचे असतात. मात्र, सध्या हे सगळे होताना दिसत नाही. त्याचा मूळ हेतूच नाहीसा झाला असल्याचे निदर्शनास येत आहे.
जागा जमिनी विक्री करून आलेला पैसा, मुला- मुलींच्या वाढलेल्या अवास्तव अपेक्षा, एकमेकातील चढाओढ व टीव्ही मालिकांचे अनुकरण यामुळेच विवाह समारंभाचा मूळ हेतूच नाहीसा झाला आहे.
– संजय लिम्हण, माजी सरपंच
पूर्वीच्या काळी लग्नसोहळे एखाद्या सणासारखे पार पाडले जायचे. मात्र सध्या काळ बदलला कोणालाच कोणासाठी वेळ नाही. सर्व गोष्टी झटपट उपलब्ध होत आहेत. व्यवसाय धंदे वाढले असले तरी संस्कृती टिकणे व टिकविणे गरजेचे आहे.
– आण्णा लिम्हण, शेतकरी, वेल्हे.