मुंबई – आम्ही विरोधकांनी दोन बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये इंडिया असं विरोधकांच्या एकजुटीला नाव देण्यात आलं. याच इंडियाची ३१ ऑगस्ट रोजी मुंबईत बैठक पार पडणार आहे अशी माहिती शरद पवार यांनी दिली. माध्यमांशी बोलताना पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य देखील केले.
उद्या बीडमध्ये सभा घेऊन मुंबईला परतणार असल्याचे देखील शरद पवार यांनी यावेळी सांगितले. मोदी सरकारच्या अनेक निर्णयांमुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याची खंत देखील यावेळी पवार यांनी व्यक्त केली. यामुळेच भाजप विरोधी जनमत तयार करण गरजेचं असल्याचे देखील यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले.
इतर राज्यातील पक्षांची सरकार पाडणं हा कार्यक्रम सध्या मोदी सरकारन सुरु केला आहे. मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढली जाते आणि मोदी सरकार यावेळी बघ्याची भूमिका घेते यामुळे विरोधकांनी भाजप विरोधी जनमत तयार करण्याची राजकीय गरज असल्याचे देखील पवारांनी यावेळी सांगितले.
ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते,’मी पुन्हा येईन’ त्यानंतर ते आले पण त्यापेक्षा खालच्या पदावर आले असं म्हणत पंतप्रधान मोदी देखील पुन्हा येईन असं म्हणल्याची आठवण यावेळी शरद पवार यांनी करून दिली.