जयपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधीत करताना घराणेशाहीच्या मुद्दा पुन्हा उपस्थित करीत कॉंग्रेसवर निशाणा साधला होता त्यावर आज दुसऱ्या दिवशी प्रतिक्रीया देताना कॉंग्रेसने म्हटले की देशातील महत्वाच्या विषयावरून लोकांचे ध्यान अन्यत्र वळवण्यासाठीच त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.
मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात देशाच्या विकासात कसलेही योगदान दिलेले नाही असेही कॉंग्रेसने म्हटले आहे. येथील प्रदेश कॉंग्रेस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना राजस्थान कॉंग्रेसचे प्रमुख गोविंद सिंग दोतसरा म्हणाले की, भाजपमध्येच ‘परिवारवाद’ अस्तित्वात आहे कारण पक्षाने आपल्या अनेक नेत्यांच्या मुलांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले आहे.
विकासाच्या नावाखाली त्यांनी काहीही केले नाही म्हणून खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी ते असे आरोप करतात. त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही, त्यामुळे ते जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहेत, असे ते म्हणाले.त्यांचे बोलणे आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती याचा कधीच संबंध नसतो. किरण माहेश्वरी यांच्या मुलीला तिकीट कुणी दिलं? वसुंधरा राजे यांच्या मुलाला कुणी दिलं तिकीट? राजनाथ सिंहांच्या मुलाला कुणी दिलं तिकीट? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.