मुंबई -कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेची आणि ते अदानी प्रकरणी विचारत असलेल्या प्रश्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धास्ती वाटत आहे. त्यामुळेच मोदींना संसदेत राहुल नको आहेत, असा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
राहुल यांची खासदारकी रद्द झाली आहे. त्याचा संदर्भ घेऊन चव्हाण यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी मोदींना लक्ष्य केले. शिवसेनेचा ठाकरे गट, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा नुकतीच छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. त्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विशेष महत्त्व देण्यात आल्याचे जाणवले.
त्या सभेला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, त्या चर्चा चव्हाण यांनी फेटाळून लावल्या. आघाडीत आलबेल आहे.
भविष्यातील निवडणुका आम्ही एकत्रितच लढू. त्यामुळे आघाडीचे नेतृत्व कोण करणार अशी चर्चा करण्यात अर्थ नाही. प्रत्येक सभेचे सुकाणू वेगवेगळ्या पक्षाकडे असेल. पहिल्या सभेत शिष्टाचारानुसार माजी मुख्यमंत्री ठाकरे यांना मान देण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.