सातारा -अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागाला जोरदार वाऱ्यासह सुमारे अर्धा तास अवकाळीने तडाखा दिला. मात्र, या पावसाने चैत्राच्या रखरखाटात हवेत दिलासादायक गारवा निर्माण झाला होता.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात 7 व 8 एप्रिल रोजी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. हा अंदाज खरा ठरला. सातारा, कराड, कोरेगाव, पाटणचा पूर्व भाग आणि महाबळेश्वर तालुक्यात शुक्रवारी दुपारी 4 नंतर सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसाने साताऱ्यात नागरिकांची धावपळ झाली. जोरदार वाऱ्यामुळे सातारा शहराच्या पश्चिम भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
पावसाने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. महाबळेश्वर, पाचगणी भागात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुपारपासून ढगाळ हवामान झाले होते. त्यानंतर पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठेत पाणीच पाणी झाले होते. या पावसाचा फटका स्ट्रॉबेरीला बसणार आहे. हापूससह कर्नाटकी रायवळ आंब्यालाही अवकाळीचा फटका बसला असून, बळीराजाची चिंता वाढली आहे.