नवी दिल्ली – करोना व्हायरसच्या नव्या प्रकाराने (स्ट्रेन) ब्रिटनमध्ये धुमाकूळ घातला आहे. नवा व्हायरस आधीच्या व्हायरसपेक्षा 70 टक्यांनी अधिक वेगाने पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. करोनाच्या नव्या लाटेमुळे पंतप्रधान बोरीस जाॅन्सन यांनी ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. तेथील परिस्थिती लक्षात घेता जगभरातून 15 हून अधिक देशांनी विमान प्रवासावर निर्बंध घातले आहेत.
भारत सरकारनेही खबरदारीचा उपाय म्हणून युनायटेड किंग्डममधून भारतात येणाऱ्या विमानांवर 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत ही बंदी असणार आहे. उद्यापर्यंत जी विमानं युकेहून भारतात येतील त्यातील प्रवाशांना करोना चाचणी करणं आवश्यक असणार आहे. सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आजच काॅंग्रसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ब्रिटनमधून येणाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात यावे, ब्रिटनच्या विमानांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली होती. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ब्रिटनच्या विमानांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
केंद्र सरकार अलर्ट मोडवर, नागरिकांनी घाबरू नये –
“केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. गेल्या वर्षभर सरकारने देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक निर्णय घेतल्याचे तुम्ही पाहिले आहे. काय करावे आणि काय करू नये याची पूर्ण कल्पना सरकारला आहे. जनतेने घाबरण्याचे काही कारण नाही.’ असे सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.