नवी दिल्ली – बीसीसीआयने अखेर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या मोसमाबाबत गंभीर विचार केला व निर्णय घेतला आहे. नव्या वर्षात मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेने मोसमाची सुरूवात होणार असून मानाच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.
मार्च महिन्यापासून जगभरात करोनाचा धोका वाढल्याने सर्व स्पर्धा ठप्प झाल्या होत्या. आता जवळपास नऊ महिन्यांनी बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटला प्रारंभ करण्याची भूमिका गेतली आहे.
सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा पुढील वर्षी 10 ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी 2 जानेवारीपर्यंत ठरलेल्या ठिकाणी दाखल व्हावे लागणार आहे.
बीसीसीआयने स्पर्धेसाठी सहा केंद्रे निश्चित केली आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आज सर्व राज्य संघटनांना या स्पर्धेबाबत माहिती दिली. त्यानंतर सर्व राज्य संघटना याबाबत आपले मत व्यक्त करणार आहे. त्यानंतर या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली स्पर्धा प्रथम खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. पण अद्याप रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या स्पर्धेच्या आयोजनानंतर रणजी करडंक क्रिकेट स्पर्धेबाबत निर्णय घेतला जाईल.
ही स्पर्धा नेमकी कशी खेळवली जाते, यावर बीसीसीआयच्या पुढच्या स्पर्धांचे आयोजन अवलंबून असेल. कारण करोनानंतर भारतामध्ये ही पहिली स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनात काय प्रश्न निर्माण होतात हे पाहून बीसीसीआय पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
स्पर्धांना सुरुवात होणे गरजेचे – कुलदीप
टी-20 विश्वकरंडक स्पर्धा जर रद्द झाली तर सय्यद मुश्ताक अली टी-20 स्थानिक क्रिकेट स्पर्धा व्हावी. मुश्ताक अली स्पर्धा खेळविणे शक्य झाले तर पुढील स्पर्धांनाही अनुकूल वातावरण निर्माण होइल, त्यामुळे लवकरात लवकर स्पर्धा सुरू होणे देशांतर्गत क्रिकेटसाठी व खेळाडूंसाठी आवश्यक आहे, असे मत भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने व्यक्त केले आहे.