-हेमंत देसाई
देशातले व परदेशातले लोक आपल्यावर टीका का करत आहेत, हे विचारात घेऊन, स्वतःमध्ये सुधारणा घडवली, तरच टीकाकारांना सडेतोड व परस्पर उत्तर मिळते. टीकाकारांची तोंडे बंद करण्याचा तोच एक विधायक मार्ग आहे.
पॉप गायिका रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग प्रभृती आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटीजनंतर हॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री सुसान सॅरडन यांनीही नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनास समर्थन जाहीर केले आहे. “मी अद्याप शेतकऱ्यांसोबतच आहे आणि कितीही धमक्या दिल्या’, तरी माझ्या भूमिकेत बदल होणार नाही’, असे ग्रेटाने पुन्हा ठणकावले आहे. मात्र परदेशातील व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये लक्ष घालू नये, अशी भूमिका लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, अक्षयकुमार, अजय देवगण प्रभृतींनी घेतली. “ज्या विषयाशी आपला संबंध नाही, त्याबद्दल न बोलले, तर बरे’, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिनला उद्देशून रास्तपणे दिला आहे.
एखाद्या आंतरराष्ट्रीय पाहणीत भारताचा नंबर कसा वरचा आहे, ईझ ऑफ डुइंग बिझिनेसच्या जागतिक क्रमवारीमध्ये आपण कशी भरारी मारली आहे, याचा प्रचार मोदी सरकार नेहमीच करत असते. डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ते जपानचे भूतपूर्व पंतप्रधान शिंजो आबे यांच्यापर्यंत अनेक नेते जेव्हा मोदींची प्रशंसा करत होते, तेव्हा भाजपतर्फे त्याची दवंडी पिटली जात होती. मात्र विदेशातील कोणतीही खासगी व्यक्ती अथवा सेलेब्रिटीज यांना दुसऱ्या देशातील घटनांवर भाष्य करण्याचा अधिकार आहे हे लक्षात न घेता, भाजपच्या ट्रोल आर्मीतर्फे त्यांच्यावर हल्ला चढवला जात आहे. अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयडचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू असो वा ब्रिटनमधील ब्रेक्झिट असो. असंख्य भारतीय त्यावर टीकात्मक भाष्य करत असतात. परंतु भारतातील एखाद्या आंदोलनावर परकीय व्यक्तींनी भाष्य केल्याचे आपल्याला आवडत नाही!
भारतात अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच, शेतकरी आंदोलने अशा वेगेवगळ्या विषयांवरून लंडन टाइम्स, द गार्डियन, वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स, टाइम, ल मान्दे आदी वृत्तपत्रे व नियतकालिकांनी टीकाच केली आहे. अमेरिकन व ब्रिटिश खासदारांनीही शेतकरी आंदोलनाचा विषय भारत सरकारने नीट हाताळला नसल्याची टीका केली आहे. अन्य देशांच्या सरकारांनी भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये, ही भूमिका म्हणून योग्यच आहे. परंतु श्रीलंकेतील सिंहली व तामिळ संघर्षात भारताने हस्तक्षेप केला होताच.तियाननमेन चौकात चिनी पोलिसांनी तरुण आंदोलकांवर बेफाम गोळीबार केला, तेव्हा भारताने आपली प्रतिक्रिया नोंदवली होतीच. ते असो. पण मोदी यांनी तर, “अगली बार ट्रम्प सरकार’, अशी घोषणा अमेरिकेत जाऊन दिली होती. तो तर परराष्ट्र धोरण संकेतांचा संपूर्ण भंग होता. खरे तर, मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेलाच आता तडा जाऊ लागला आहे. यावर एक उपाय म्हणजे, अशा टीकाटिप्पण्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे.
पाश्चात्त्य देश काय म्हणतात, याकडे तुर्कस्तानचे एकाधिकारशाहीवादी अध्यक्ष एर्दोगन हे साफ दुर्लक्ष करतात. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन तसेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनाही कोणी कितीही टीका केली, तरी काहीही फरक पडत नाही… भारतासारख्या लोकशाहीवादी देशास अशा प्रकारची बेफिकिरी पचत नाही. शिवाय मोदी यांनी जगातील प्रगत व अप्रगत अशा असंख्य देशांचा दौरा केला आहे. बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प, पुतिन, मॅक्रॉन, जिनपिंग अशा अनेक नेत्यांशी व्यक्तिगत दोस्ती केली आहे. परराष्ट्र संबंधांत इतकी गुंतवणूक करूनही भारताला टीकेचा धनी व्हावे लागत असेल, तर विश्वगुरू मोदी यांना आत्मपरीक्षण करावेच लागेल.
काश्मीरबद्दल अधिक संवेदनशील धोरणे स्वीकारायला हवीत. जवळपास दीड वर्षांनी काश्मीरमध्ये फोर जी सेवा सुरू करण्यात आली. या प्रकारचे बंधन घालणे आवश्यक होते का, याबाबतही सरकारने परत एकदा नीट विचार केला पाहिजे. पंजाबच्या शेतकऱ्यांना “खलिस्तानी’ ठरवणे चूक होते, हे मान्य केले पाहिजे. दिल्लीतील सर्व मार्ग बंद करणे, भारत-चीन वा भारत-पाक सीमेपाशी जशी तटबंदी उभारली जाते, तशी तटबंदी दिल्लीतील रस्त्यांवर उभारणे, आंदोलक शेतकऱ्यांचे पाणी व वीज कनेक्शन तोडणे, राजदीप सरदेसाईंसारख्या पत्रकारांवर देशद्रोहाचे गुन्हे नोंदवणे यासारखी दडपशाही थांबवली पाहिजे. सरकारवर उपरोधपूर्ण टीका करणाऱ्या स्टॅंडअप कॉमेडियन्सना अटक करणे वा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणे, हा तर वेडाचारच होता.
कोणत्याही टीकेमुळे भारताच्या प्रतिमेला छेद जातो, सार्वभौमत्वावर गदा येते, असे मानणे पोरकटपणाचे आहे. कॅनडाचे पंतप्रधान ट्रुदो यांनी भारताबाबत शेरेबाजी करायला नको होती. त्यास आक्षेप घेणे योग्यच आहे. परंतु ब्रिटन, अमेरिका व युरोपातील लोकप्रतिनिधींनी भारतातील घडामोडींवर भाष्य केले, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय? परंतु आपण तर इतके हळुवार मनाचे झालो आहोत की, रिहाना व थनबर्ग यांच्या ट्विट्सलाही भारताचे परराष्ट्र खाते प्रतिक्रिया देऊ लागले आहे! शिवाय रिहाना, थनबर्ग, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची नातलग मीना हॅरिस यांच्या विरोधात अश्लाघ्य शेरेबाजी करणाऱ्या “ट्विप्पण्या’ करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटीजना उत्तरे देणाऱ्या भारतीय सेलेब्रिटीजच्या “ट्विप्पण्यां’मध्ये मजकुराचे साधर्म्य होते.
एकेकाळी भारतातली सत्ता अस्थिर करण्याचा परकीय शक्तींचा प्रयत्न आहे, असा आरोप इंदिरा गांधी करत असत. विरोधकांनी आंदोलन केले, की त्यातही त्यांना परकीय हात दिसायचा. मोदीजींसमोर तेच मॉडेल आहे, असे दिसते.