नवी दिल्ली – देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांसाठी आपल्या तिजोरीची दारे आणखी खुली करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत सध्या लहान शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत वर्षाला सहा हजार रूपये केंद्र सरकारकडून दिले जातात.
त्यात वाढ करून शेतकऱ्यांना आता वर्षाला आठ हजार रूपये देण्याची तयारी सरकारकडून करण्यात आली असल्याची बातमी आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना वर्षाकाठी आता 8 हजार रूपये दिले जाण्याचा विचार केला जातो आहे.
यासंबंधीच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
जर या निर्णयाला मंजुरी देण्यात आली तर सरकारला योजनेसाठी अतिरिक्त 20 हजार कोटी रूपये खर्च करावे लागणार आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 साठी या योजनेकरता 60 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती, त्यात आता या 20 हजार कोटी रूपयांची भर पडणार आहे.
मात्र अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी काही बोलण्यास नकार दिला. 1 फेब्रुवारी 2024 रोजी मोदी सरकारकडून लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
त्याच वेळी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अन्य मंत्रालयांशी चर्चाही सुरू केली असून त्या दिशेनेही काही वेगळ्या घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.