पुणे – राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. मात्र, या वातावरणात उद्यापासून (शुक्रवार) बदल होणार आहे. कारण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वारे व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
विदर्भ, कोकणातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. चैत्र महिना सुरू असतानाच वैशाख वणवा जाणवू लागला आहे. कोकण, महाबळेश्वर वगळता सर्वच ठिकाणी तापमान 36 अंशांच्या पुढे आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत मालेगावासह, धुळे, सोलापूर, परभणी, अकोला, वर्धा येथे तापमान चाळिशीच्या पुढे होते. यातूनच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.