नवी दिल्ली – भारतामध्ये 5- जी सेवा सुरू झाल्या आहेत. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतातील मोबाईल सेवांचा वेग वाढला आहे. जागतिक क्रमवारीत भारत 47 व्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी या क्रमवारीत भारत 119 व्या क्रमांकावर होता.
एकाच वर्षात 72 अंकाची सुधारणा होऊन भारत 47 व्या क्रमांकावर आला आहे. ओकला या संस्थेने जागतिक पातळीवर मोबाईल डाउनलोड वेग किती आहे या संदर्भात माहिती संकलित केली आहे. यानुसार भारतात 5- जी सेवामुळे मोबाईलचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला असल्याचे दिसून आले. या वेगवान सेवात भारत बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान या देशाच्या कितीतरी पुढे आहे.
मात्र बऱ्याच जी- 20 सदस्य देशातही भारत पुढे गेला आहे. जी 20 हे तुलनेने विकसित देश समजले जातात. या यादीत मेक्सिको 90 व्या क्रमांकावर, तुर्कस्तान 68 व्या क्रमांकावर, ब्रिटन 62 व्या क्रमांकावर, जपान 58 व्या क्रमांकावर, ब्राझील 50 व्या क्रमांकावर तर दक्षिण आफ्रिका 48 व्या क्रमांकावर आहे. म्हणजे जी 20 सदस्य देशातील सहा देशांच्या पुढे भारताचे स्थान आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये भारतातील मोबाईल डाऊनलोडचा वेग केवळ 13.87 एमबीपीएस होता. ऑगस्ट 2023 मध्ये हा वेग 50.21 एमबीपीएस इतका नोंदला गेला आहे. त्यामुळे या क्रमवारीत भारत कितीतरी पुढे गेला असल्याचे दिसून येते.
भारतातील मोबाईल कंपन्यांनी 5- जी उपलब्ध करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारने या कंपन्यांना आवश्यक ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत उपलब्ध केली आहे. त्यामुळे भारतातील मोबाईल सेवांचा वेग कितीतरी जास्त असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
भारतातील रिलायन्स जिओ आणि भारतीय एअरटेल या कंपन्यांनी बहुतांश मोठ्या शहरांमध्ये 5-जी सेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांच्या ग्राहकांच्या संख्येतही वेगाने वाढ होत आहे. आता छोट्या शहरातही या सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
अर्थव्यवस्थेला लाभ
5- जी सेवामुळे भारतातील उद्योग आणि विद्यार्थ्यांना याचा चांगला लाभ होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पाहिजे ती माहिती लवकर उपलब्ध होते. त्याचबरोबर उद्योगांची परस्परांशी समन्वय वाढला आहे. याचा अप्रत्यक्षरीत्या भारतीय अर्थव्यवस्थेला लाभ होत आहे. भारताने डिजिटल इंडिया ही मोहीम सुरू केलेली आहे. त्यामुळे मोबाईलच्या आधारावर विविध सेवा उपलब्ध करण्यात येत आहेत. या सेवामुळे भारतीय नागरिकांच्या जगण्याचा दर्जा वाढला असल्याचे दिसून येत आहे.