मुंबई – ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना निवडणूक लढणार असल्याचं आव्हान दिल. आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या आव्हानावरून आता मनेचे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना डिवचले आहे.
आदित्य ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्तीला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ठाण्यात मोर्चा काढला होता. यादरम्यान बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंविरुद्ध लढून जिंकून दाखवणार असल्याचे वक्तव्य केले. आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये संदीप देशपांडे म्हणतात,”वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज आहे.आपण पुन्हा वरळीतून निवडून येणार नाही याची जाणीव झाल्यामुळे ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न तर चालू नाहीना ?” असा टोला नाव न घेता संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज आहे.आपण पुन्हा वरळीतून निवडून येणार नाही याची जाणीव झाल्यामुळे ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न तर चालू नाहीना ???
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 7, 2023
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे नेमकं
मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला आलो आहे. तुम्ही ज्याला स्वत:चा बालेकिल्ला मानता(आता मानत नाही) त्या ठाणे शहरात आलो आहे. तुम्हाला आव्हान आहे की, मी ठाण्यातून लढून जिंकून दाखवणार. ठाणेकर मला स्वीकारायला तयार आहेत, असे म्हणत आदित्य यांनी मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान दिले होते.“एका व्यक्तीच्या स्वार्थापायी सरकार उलथवले. आम्ही लवकरच पुन्हा सत्तेत येणार, ज्यांना जागा दाखवायची त्यांना जागा दाखवणार, असा हल्लाबोलही आदित्य यांनी यावेळी केला. यावेळी सुषमा अंधारे तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते.