मुंबई – भाजप आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईच्या विकासाबाबत एक पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. महापालिकेच्या निवडणुका आल्या आहेत म्हणून आदित्यसेनेनं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या व मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणार अशा उलट्या बोंबा सुरु केल्याची टीका राणेंनी पत्रातून केली आहे.
जवळच्यांना टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकासकांमुळे मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार झाला असल्याचा आरोप आमदार राणेंनी यावेळी केला आहे. नितेश राणे हे सतत शिवसेनेला कोणत्या ना कोणत्या करणावरून लक्ष करत असतात. मात्र यावेळी त्यांनी थेट फडणवीसांना पत्र लिहीत मुंबई महापालकेतील सत्ताधारी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
काय म्हंटलेत राणे नेमकं आपल्या पत्रात
पुर्नविकास नियंत्रण नियमावली अंतर्गत भाडेकरू तथा एसआरएमधील झोपडपट्टी धारक खासगी विकासकांची नेमणूक करतात. या पद्धतीच्या अनेक पुर्नविकास प्रकल्पांमध्ये विकासक एक ते दिड वर्षांचे पर्यायी जागेचे भाडे देणे कबूल करतात. परंतु अनेक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अनेक विकासकांची कामे रखडल्याने त्यांनी भाडेही देणे बंद केले आहे
एका बाजूला कोविडमुळे मराठी बांधवांची रोजीरोटी केली आणि दुसऱ्या बाजूला मुंबईतील मराठी माणसाला आपल्या आयुष्यातील सहा सहा तास वसई विरारच्या प्रवासात घालवावे लागतात. आहे ते घर विकासकाने अडवून ठेवलंय आणि भाडे मिळण्याअभावी घरातून हकालपट्टी होतेय. काही ठिकाणी तर इमारत तयार असूनही ना इमारत ताब्यात मिळतेय ना हक्काचे भाडेही मिळतेय. त्यामुळे नाईलाजास्तव मराठी कुटुंब आपले हक्काचे घर विकासकला किंवा एजंटला स्वत: दरात विकण्यास बाध्य होतात.
— nitesh rane (@NiteshNRane) September 23, 2022
त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये सरकारच्या वतीने ठोस पाऊल उचलून जनतेला वेठीस धरणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. या प्रकरणात आपण लक्ष घालून सर्व सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रातून उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.