नगर, (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नगरमधी शिववरद प्रतिष्ठानने खरा माणूसकीचा धर्म जपला आहे. शहातील साधारण सातशे माणसांची भूक भागवितानाच त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देत किशोर डागवाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक जबाबदारीचा नवा आदर्श जनतेसमोर ठेवला असल्याची भूमिका माजी खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केली. करोनासारख्या संकटकाळात शिववरद प्रतिष्ठानने पुढे येऊन गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वादिष्ट पदार्थांचे अन्नछत्र चालविले. हे एक ईश्वरी कार्यच आहे, असेही गांधी म्हणाले.
भाजपचे माजी शहर-जिल्हा उपाध्यक्ष किशोर डागवाले यांच्या नेतृत्वाखाली नगरमधील शिववरद प्रतिष्ठानतर्फे रंगारगल्ली येथील महाले मंगलकार्यालयात सुरु केलेल्या अन्नछत्रास माजी मंत्री दिलीप गांधी व सरोज गांधी यांनी भेट दिली. तेथील फूट पॅकेट बनविण्याच्या उपक्रमात थेट सहभागही घेतला.
डागावले यांच्या मार्गदर्शनाखाली दरोरज पोळी-भाजी व त्याच्या जोडीला एक गोड पदार्थ, असे फूड पॅकेट तयार करण्यात येत आहे. शहरातील विविध भागातील गरजू नागरिकांना ते घरपोच दिले जात आहे. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य, महिला मंडळ त्यासाठी योगदान देत आहे. या उपक्रमाबद्दल गांधी यांनी किशोर डागवाले यांचे कौतुक केले.
डागवाले यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली. लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक, विडी कामगार व गरीब नागरिक संकटात सापडले आहेत. अशा सुमारे सातशे गरजू नागरिकांना शिववरद प्रतिष्ठान दरोरज सकाळचे जेवण घरपोच देत खारीचा वाटा उचलत आहे, असे ते म्हणाले.लॉकडाऊन चालू आहे, तोवर सर्व नियमांचे पालन करून अन्नदानाचे हे पवित्र काम सुरुच असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शिववरद प्रतिष्ठानाच्या पदाधिकारी अशा डागवाले, आरती आढाव, ज्योती माळवदे, पोर्णिमा नामदे, सुजाता बुरा, सुभाष दारवेकर, ऍड. बाळासाहेब ढोरे, प्रदीप काठेड, रोहन डागवाले, ए. एम. खान, सागर गोरे, निरीन डागवाले, अनिल वाघ, सचिन सप्रे, बाळासाहेब वाघ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले आहेत.