पिंपरी – कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून आज त्यांनी भारत बंद ची हाक दिली होती. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी सर्वपक्षीय व कामगार संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. पिंपरी-चिंचवड शहरात या बंद ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर सहभागी संघटनांच्या आंदोलकांनी अन्नत्याग व धरणे आंदोलन केले.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मंगळवारी (दि. 8) सकाळी अकरा वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून आंबेडकर चौकातील वाहतूक वळवण्यात आली होती.
या आंदोलनाला राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, एमआयएम, स्वराज अभियान, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, नागरी हक्क सुरक्षा समिती, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, शिवशाही व्यापारी संघ, महात्मा फुले समता परिषद, बारा बलुतेदार संघटना, छावा, प्रहार संघटनांबरोबरच श्रमिक एकता महासंघ, आयटक, इंटक, सीटू, बजाज कामगार संघटना, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला महासंघ, महाराष्ट्र रिक्षा पंचायत या संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता. या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी हजेरी लावत नव्या कृषी व श्रम कायद्यांना विरोध केला.
आंदोलनाच्या काळात शहराच्या विविध भागांमधील दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु होते. तर खबरदारीचा उपाय म्हणून एसटी प्रशासनाने वल्लभनगर आगारातील प्रवासी वाहतूक बंद ठेवली होती. मात्र,शहरातील विविध मार्गांवर पीएमपी बस धावत होत्या.