योजनांवर खर्च होणारा पैसा जनतेचा; तो जनतेपर्यंत पोचलाच पाहिजे
नगर: कर्जत-जामखेड मतदार संघात निवडणून आल्यापासून आमदार रोहित पवार ऍक्टिव्ह मोडवर आहेत. त्यांनी त्यांच्या मतदार संघात अनेक कामांचा धडाका लावला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना रोहित पवार म्हणाले, सरकारी योजना जरी चांगल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी कशी होते, यावर त्या योजनेचं यशापयश अवलंबून असतं. योजनांची व्यवस्थित अंमलबजावणी होऊन त्यामध्ये गैरप्रकार होणार नाही याची माझ्यासह सर्वच लोक्रतिनिधींना दक्षता घ्यावी लागणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.
सरकारी योजना जरी चांगल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी कशी होते, यावर त्या योजनेचं यशापयश अवलंबून असतं. दुष्काळातील जनावरांना वाचवण्यासाठी सुरु केलेल्या चारा छावण्या, भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी आखलेली जलयुक्त शिवार योजना, लोकांना पाणी पुरवण्यासाठी सुरु केलेले टँकर या योजनाही अशाच आहेत. मागील सरकारच्या काळात या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय असून तशा अनेक तक्रारीही दाखल झाल्या आहेत. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे, असे पवार म्हणाले.
योजनांवर खर्च होणारा पैसा हा सरकारचा अर्थात जनतेचा असल्यामुळे योजनांच्या माध्यमातून तो जनतेपर्यंत पोचलाच पाहिजे. नसेल पोचत तर त्यात कुठे गळती होते किंवा कोणी त्यावर आडवा हात मारत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची आणि ते रोखण्याची एक लोक्रपतिनिधी म्हणून माझीही जबाबदारी असल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केले.