स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून आरोप
बंद करण्याची राज्य शासनाकडे मागणी
पुणे – राज्य सरकारच्या विविध पदभरतीच्या परीक्षा “महापरीक्षा पोर्टल’द्वारे घेण्यात येतात. मात्र, पोर्टलमध्ये अनेक गैरप्रकार निदर्शनास येत आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ते बंद करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून होत आहे.
राज्य शासनाने 2017 साली महापरीक्षा पोर्टल ऑनलाइन परीक्षा घेण्यात आणले. सप्टेंबर 2018 पर्यंत महापरीक्षा पोर्टलमार्फत कुठल्याही परीक्षेची उत्तरपत्रिका, विद्यार्थ्यांच्या प्रश्न-उत्तरपत्रिका, त्यावर आक्षेप घेण्यासाठी संधी, उत्तरपत्रिकेची विषयतज्ज्ञांमार्फत पुन्हा पडताळणी, त्यावर अंतिम उत्तरपत्रिका व निकाल अशा प्रकारची कोणतीच पद्धत राबविण्यात आली नाही. तसेच, महापरीक्षा पोर्टल कुठे काम करते, कार्यालयाचा पत्ता, कशा प्रकारे काम करते, पारदर्शकता कशी असते याची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे या पोर्टलवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
पोर्टल बंद करण्यासाठी पत्राची मोहीम
नोकरभरतीसाठी असलेले महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी “एमपीएससी’ स्टुडंटस् राईटस्च्या वतीने पत्राची मोहीम राज्यभरात सुरू केली आहे. राज्यातील सर्व परीक्षार्थी, उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. नवीन सरकारला हे पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी सहकार्य करावे, असेही संघटनेने नमूद केले आहे.
परीक्षेत गैरहजर, तरी उमेदवाराची निवड
काही महिन्यांपूर्वी महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदाची ऑनलाइन परीक्षा घेतली होती. जालना जिल्ह्याचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात जो उमेदवार परीक्षेला गैरहजर होता, त्याची अंतिम यादीत निवड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार निदर्शनास येताच सुधारित अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे हे पोर्टल बंद करावे, अशी मागणी “एमपीएससी’ स्टुडंटस राईटस्चे महेश बडे यांनी केली आहे.