पुरंदर तालुका वार्तापत्र : – एन. आर. जगताप
पुरंदर – तालुका फळबागांचे आगार आहे. पाण्याची तीव्र टंचाई असूनही तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक प्रतिकूल वातावरणात अनेक संकटाचा सामना करत फळबागा फुलवतात. या भागातून मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या सीताफळ, अंजीर, डाळिंब या फळांना योग्य बाजारपेठ मिळत नसल्यामुळे फळ उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
तालुक्यातील फळबागांखालील क्षेत्र व उत्पादन यामध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी फळांची काढणी, हाताळणी, वर्गवारी, पॅकिंग, साठवण, वाहतूक, विक्री आणि प्रक्रिया या बाबी शास्त्रीय पद्धतीने तसेच योग्य वेळी होणे गरजेचे आहे. फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सध्याच्या साखर कारखाने किंवा दूध संघाच्या धर्तीवर तालुका तसेच जिल्हापातळीवर तसेच फूड पार्कच्या माध्यमातून सहकारी तत्त्वावर फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग पुरंदर तालुक्यात उभारणे गरजेचे आहे.
पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणारे सीताफळ हे कोरडवाहू फळझाडांमध्ये हेक्टरी महत्त्वाचे फळपीक असून त्याची लागवड प्रामुख्याने अवर्षणग्रस्त भागात आणि हलक्या जमिनीत केली जाते. पुरंदर तालुक्यातील अंजीर हे दुसरे मोठ्या प्रमाणात उत्पादित होणारे फळ आहे. ताज्या अंजिरांना बाजारपेठेत मोठी मागणी असते. तालुक्यात डाळींब हे तिसरे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाणारे फळ आहे. फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सध्याच्या साखर कारखाने किंवा दूध संघाच्या धर्तीवर तालुका, तसेच जिल्हा पातळीवर तसेच फूड पार्कच्या माध्यमातून सहकारी तत्त्वावर फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग पुरंदर तालुक्यात उभारणे गरजेचे आहे.
याबाबत शासनानेही संकल्पना राबवण्यावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यात प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करून योग्य मार्गदर्शन सल्ला तसेच प्रक्रिया उद्योगांसाठी निधी उभारणीकरिता शासनाकडून अनुदान देणे या बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यामुळे तालुक्यातील बेरोजगार तरुणांना व महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व फळ उत्पादकांना आर्थिक लाभ मिळेल.