प्रभात वृतसेवा पुणे, दि. 1 – महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा चारचा प्रभाग करावा म्हणून न्यायालयात याचिका दाखल झाली असली तरी आता निवडणूक प्रक्रिया खूप पुढे आली आहे. त्यामुळे प्रभाग चारचा होईल, याची अपेक्षा न ठेवता तीन सदस्यांच्या प्रभागातच निवडणूक लढविण्याची तयारी ठेवा, अशी सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिली. याशिवाय तिकिटवाटप करताना विद्यमान नगरसेवकांना प्राधान्य दिले जाणार असले तरी, त्यांच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचा विचार करुनच संधी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पक्ष कार्यालयात नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत या सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीस शहरातील भाजप आमदार, कोअर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत प्रामुख्याने महापालिका निवडणुका आणि शहरातील राजकीय स्थितीबाबत चर्चा करण्यात आली. त्यात प्रभाग रचना, ओबीसी अरक्षणामुळे झालेले बदल आणि त्यामुळे समोर आलेल्या अडचणी याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार प्रत्येक विधानसभानिहाय कोअर कमिटी करून त्या विधानसभेत येणाऱ्या प्रभागांमधील इच्छुकांची यादी करून तसेच मुलाखती घेऊन त्यांच्या नावांच्या याद्या शहर कार्यालयाकडे द्याव्यात, अशी यावेळी सांगण्यात आले.
या समितीत स्थानिक आमदार, विधानसभा अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष तसेच इतर काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही नावे प्रभागाच्या कोअर कमिटीकडून शहराकडे आल्यानंतर ती पुढे राज्याकडे पाठविण्यात येऊन त्यानंतर तिकिटाबाबत निर्णय घेतले जाणार आहेत. तसेच शहरातही वेगवेगळे कार्यक्रम तसेच इतर उपक्रमांमधून पक्षाच्या पाच वर्षांच्या कामाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.
अनेकांच्या तिकिटावर गंडांतर
भाजपमध्ये आधीच तीनच्या प्रभागाने अनेकांच्या तिकिटावर गदा आली आहे. त्यातच आता पक्षाने जागांची जुळवाजुळव करण्यासाठी नगरसेवकांच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचा विचार केला जाणार आहे. या काळात अनेक नगरसेवक केवळ ठेकेदारांमध्येच व्यग्र असल्याने त्यांच्याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. या निवडणुकीत शिंदे गटही रिपाईसोबत भाजपमध्ये असल्याने या गटालाही भाजपला जागा सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे अनेकांचे तिकिट पक्षाकडून कापले जाण्याचे बोलले जात असून, या नगरसेवकांच्या प्रदेशाध्यक्षांकडे फेऱ्या वाढल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.