नवी दिल्ली – गरिबी हटविणे, खेड्यांची सुधारणा करणे ही काही केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येकाची आहे, असे उद्गार इंदिरा गांधी यांनी काढले. “उपग्रहाद्वारा दूरचित्रवाणीवरून लोकशिक्षण’ कार्यक्रमाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. प्रत्येकाने हे लक्षात घेतले पाहिजे की, स्वतःचे घर, गाव स्वच्छ ठेवणे, ते अधिक सुंदर बनविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. देशाला प्रगतिपथावर जाण्यास मदत होईल अशा कल्पना आपण स्वीकारल्या पाहिजेत, तशा सवयी लावून घेतल्या पाहिजेत. ज्यामुळे आपण मागे जाऊ अशा सवयी टाळल्या पाहिजेत तरच प्रगती होऊ शकेल.
देशात शक्तिहीन शासन आहे अशी काही लोकांची समजूत
पुणे – देशात शक्तिहीन शासन आहे अशी समजूत करून घेऊन काही व्यक्तींनी व पक्षांनी देशात बेदली माजविण्याचा प्रयत्न केल्याने सध्याची आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, असे उद्गार परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी काढले. आणीबाणीनंतर एखाद्या मान्यवर नेत्याने पुण्यात जाहीर भाषण करण्याचा हा पहिलाच प्रसंग. विरोधी पक्षीयांच्या कारवाईमुळे देशातील परिस्थिती अशांततेची झाली होती. देशाचे ऐक्य धोक्यात आले होते. अशा परिस्थितीत कठोर कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. काही मूठभर व्यक्ती व त्यांचे हितसंबंध म्हणजे संपूर्ण देश नव्हे.