“मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे संस्थापक, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, महाराष्ट्रातील कृतिशील विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आत्माराम रावजी भट यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म रत्नागिरी येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात 12 मे 1905 रोजी झाला. त्यांचे शिक्षण रत्नागिरी व मुंबई येथे पार पडले.
भट यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेताना जाणीवपूर्वक वाणिज्य शाखा निवडली होती. भारतामध्ये त्यावेळी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आंदोलने चालू होती. परंतु नागरिकांना सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यही नव्हते यासाठी स्वातंत्र्यपूर्व भारतातील आर्थिक अडचणींचा अभ्यास करण्यासाठी वाणिज्य शाखाच त्यांना महत्त्वाची वाटली.
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी युवक चळवळीत हिरीरीने भाग घेतला. सत्याग्रहात सामील झाल्याने त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला. वर्ष 1929 मध्ये मुंबई विद्यापीठाची एम.कॉम. पदवी संपादन केल्यावर ते पुणे येथे द्वितीय मराठा संस्थेत व्यवस्थापक म्हणून काम पाहू लागले. 1952 मध्ये मुंबई विधान परिषदेवर निवडून येईपर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. बारा वर्षे ते विधानसभेचे सदस्य होते.
भारत सरकारने स्थापन केलेल्या वर्ष 1952 मधील पहिल्या “वृत्तपत्र आयोगा’चे ते सदस्य होते. तसेच वर्ष 1954 साली ब्राझीलमध्ये भरलेल्या पहिल्या जागतिक वृत्तपत्र परिषदेसाठी भारतीय प्रतिनिधी मंडळात त्यांचा समावेश होता. भारत सरकारच्या “कापड उद्योग समिती’चे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
स्वातंत्र्यपूर्व भारतातील अनेक राष्ट्रीय समस्यांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले. अनेक दैनिकांतूनही त्यांनी लेख लिहिले. महाराष्ट्रातील कारखानदारीत वाढ व्हावी, नवे उद्योजक निर्माण व्हावेत व त्यांना सर्व तऱ्हेचे मार्गदर्शन व मदत मिळावी, प्रोत्साहान मिळावे यासाठी 1934 मध्ये पुणे येथे “मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर’ची (एमसीसीआयए) स्थापना केली. या संस्थेने महाराष्ट्रातील लघुउद्योजकांमध्ये समन्वयाचे आणि संपर्क केंद्र म्हणून काम केले तसेच या छोट्या व्यवसायांतील छोट्या-छोट्या उत्पादनांची जाहिरात करणेही आवश्यक होती त्यासाठी वर्ष 1944 पासून चेंबरचे मुखपत्र म्हणून संपदा मासिक सुरू केले व त्याचे ते प्रारंभापासून संपादक होते.
वर्ष 1959 मध्ये त्यांनी पुणे विभागीय उत्पादकता परिषद स्थापन करण्यासही सहाय्य केले होते. उद्योजकांसाठी व्यवस्थापन मार्गदर्शन आणि व्यवसाय सल्लागार म्हणून ही परिषद कार्यरत आहे. त्यांनी 1959 पासून ते 1979 या कालावधीमध्ये सचिव म्हणून काम पाहिले. वर्ष 1967 मध्ये लघुउद्योगांसाठीची मार्गदर्शक सूची पुस्तिकाही त्यांनी काढली.
भट यांनी राष्ट्रीय पातळीवर भारत आयात सल्लागार परिषद, भारत सरकार कापड चौकशी समिती, भारत सरकार प्रेस कमिशन, बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आणि कम्युनिटी ऑफ इंडिया सरकार बोर्ड कम्युनिकेशन यांसारख्या शासकीय संस्थांच्या कार्यातही भाग घेतला होता.
1971 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. महिलांमध्ये उद्योजकतेची भावना वाढीस लागावी म्हणून नॅशनल अलायन्स ऑफ यंग एंटर प्रेन्युर्सची स्थापना झाली होती. या संघटनेतर्फेही 1973 मध्ये त्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. 18 जानेवारी 1983 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.