करंजगाव (अतुल चोपडे – पाटील) – नाणे मावळ परिसरात डोंगर पोखरून गौण खनिजाची चोरी होत आहे. मुरूमाची वाहतूक करणारी वाहने येथील रस्त्यावरून रात्रभर सुरू असतात. असे असताना मात्र कारवाईबाबत प्रशासनाचे हात रिकामेच असल्याचे दिसून येते.
नाणे मावळ परिसर निसर्गाने नटलेला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, नद्या येथील सौंदर्यात भरच घालतात. पावसाळ्यात हिरवा शालू नेसलेली वसुंधरा, घनदाट झाडी आणि डोंगरावरून वाहणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. यामुळे फार्म हाऊससाठी धनिक मावळलाच पसंती देतात. मात्र मावळातील या श्रीमंतीला एकप्रकारचे ग्रहण लागले आहे.
नाणे मावळात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन होत आहे.
कोणतेही खनिज उत्खनन करताना महसूल विभागाची परवानगी घ्यावी लागते. मात्र अनेकदा कोणतीही परवानगी घेतली जात नाही. काही ठिकाणी कमी रॉयल्टीची परवानगी घेऊन त्यापेक्षा चारपट जास्त गौण खनिजांचे उत्खनन सुरु असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. नाणे मावळात मध्यरात्री पासून ते पहाटे पर्यंत जेसीबी साह्याने अवैध मुरूम व माती उत्खनन सुरु असते. रात्रीच्यावेळी चोरीच्या या गौण खनिजाची वाहतूकही होत असते. वस्तीतून जाणाऱ्या रोडवरील वाहतूकीबाबत नागरिकांना माहिती असते. पण नेमके हे गौण खनिज कोठून आणि कोणी चोरले याबाबत ठोस माहिती नसते. त्यामुळे सकाळी नाणे मावळातील चौका-चौकात चोरीच्या गौणखनिजाबाबत जोरदार चर्चा होत. या अवैध मुरूम व माती उत्खननामुळे काही गावातील माळरानात व डोंगर भागात मोठ मोठे खड्डे पडले आहेत.
शहरी भागातही होतो गौण खनिजाचा उपयोग
ग्रामीण भागासह शहरी भागातील रस्ते तसेच गृहप्रकल्प उभारण्यासाठी आधी मुरूम टाकला जातो. यामुळे गौण खनिजाला सोन्याचे भाव आले आहेत. खौण खनिजासाठी परवानगी घेताना किचकट, वेळखाऊ प्रकिया आहे. त्यामुळे अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून किंवा त्यांची नजर चुकवून गौण खनिजाची चोरी केली जाते.
असा होत आहे परिणाम
डोंगर पोखरताना त्यावर असलेली झाडीही नष्ट होत आहे. त्यामुळे या भागात वास्तव्यास असलेले वन्यजीवांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. झाडी नष्ट होत असल्याने डुक्कर, बिबटे व वाघ हे प्राणी ऊसाच्या पिकामध्ये आश्रय घेतात. ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी थ्री फेजचा विद्युत पुरवठा होतो. अशावेळी पाण्याची मोटार सुरू करून पिकांना पाणी देण्यासाठी जाणेही शेतकऱ्यांना जोखमीचे ठरते.
असा ठेवला जातो वॉच
ज्याठिकाणी गौण खनिजाची चोरी करायची आहे त्या मार्गावर माफियांची माणसे देखरेख करीत असतात. एखादी शासकीय गाडी या मार्गावरून रात्रीच्यावेळी येताना दिसली की लगेच पुढील व्यक्तींना कळविले जाते. रात्रीच्यावेळी शासकीय अधिकारी गौण खनिज चोरी होत असलेल्या ठिकाणी जरी पोचले तरी त्यांच्या हाताला काहीच लागत नाही.